Wednesday, July 29, 2015

सर्पदंश -दोन लघुकथा



महाराज या विषारी नागाने आपल्या राज्यातल्या अनेक नागरिकांचे प्राण घेतले आहे. सैनिकानी त्याला पकडले आहे.  महाराज आज्ञा करावी, विषारी नागाचे काय करायचे. राजाने आज्ञा दिली, यात विचार कसला, ठेचुन टाका त्याला.  सैनिकानी तत्काल त्या नागाला ठेचुन ठार केले.


दुसरी कथा:


महाराज या विषारी नागाने आपल्या राज्यातल्या नागरिकांचे प्राण घेतले आहे. सैनिकानी त्याला पकडले आहे. महाराज आज्ञा करावी, विषारी नागाचे काय करायचे. राजाने आपल्या मंत्र्याना या बाबत त्यांच्या सल्ला मागितला. 


पहिला मंत्री: महाराज अधिक विचार न करता ह्या विषारी नागाला ठार मारले पाहिजे, जर हा सुटला तर पुन्हा लोकांना डसेल. याला जिवंत सोडले तर शेजारच्या जंगलातून अनेक नाग या नगरात येऊन प्रजेला डसतील. 


दुसरा मंत्री: महाराज, आपण नागाची बाजू हि लक्ष्यात ठेवली पाहिजे. नाग हा विषारी असतो,नागाचा दंश प्राण घेणारच. आपण सभ्य मानव आहोत.  'खून का बदला  खून' हि आपली नीती नाही. आपली प्रजा  असो  वा नाग. दोघांना एक समान न्याय मिळाला पाहिजे. बिना विचार करता त्याचे प्राण घेणे योग्य नाही.  राजाला दुसर्या मंत्रीचे विचार पटले. त्याने  नगरातील प्रतिष्ठित नागरिकांच्या समितीचा सल्ला घेण्याचे ठरविले. या समितीत अतिशय बुद्धिमान नाना कलासंपन्न आणि पुरोगामी विचारांचे प्रजाजन होते.


प्रतिष्ठित नागरिकांच्या समितीने राजाला सल्ला दिला.  राजा नाग हा विषारी असतो, तो लोकांना डसतो. हा त्याच्या स्वभाव आहे. त्याने त्याच्या स्वभावानुसारच लोकांना डसले आहे. दंश विषारी असल्यामुळे लोक मेले. त्या साठी नाग जवाबदार कसा. त्याला ठेचून मारण्याची शिक्षा देणे हा त्याच्यावर अन्याय आहे. आमची सिफारीश आहे, नागाचे प्राण घेण्याएवजी त्याला सोन्याच्या पिंजर्यात ठेवले पाहिजे.  दर नागपंचमीला त्याला दुधाचा नेवेद्य दाखविला पाहिजे. असे केल्याने तो कुठेही पळून जाणार नाही.


राजाला  प्रतिष्ठित नागरिकांच्या  समितीचे विचार पटले. त्याने नागाला जीवदान दिले. एका सोन्याच्या पिंजर्यात नागाला ठेवले. दर नागपंचमीला तो दुधाचा नेवेद्य नागाला दाखवू लागला. एका नागपंचमीला नागाला दुधाचा नेवेद्य दाखवीत असताना तो नाग राजाला डसला. नाग दंशाने राजाची मृत्यू झाली.  

आता प्रश्न आहे, राजाच्या मृत्यूला  कारणीभूत कोण? नाग कि प्रतिष्ठित नागरिकांची समिती. 


स्वामी त्रिकाळदर्शी म्हणतात, ज्याला याचे उत्तर कळेल, त्याची सर्पदंशाने कधीच मृत्यू होणार नाही.



  

Sunday, July 26, 2015

‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’-मी जालावर लेखकू का झालो


दोन-तीन दिवस अगोदर मला माझ्या एका मित्राने प्रश्न विचारला. ‘पटाईतजी सच सच बताओ आपने इंटरनेट पर लिखना क्यों शुरू किया’.  त्याने विचारलेल्या प्रश्न ऐकून मी विचारात पडलो.  मी अंतर्जालावर  लिहिणे का सुरु केले? नकळत समर्थांचे वचन आठवले. समर्थ म्हणतात, ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’. प्रत्येक नश्वर जीवाला अमर व्हावेसे वाटते. मृत्यू लोकात  शरीराने कुणीच अमर होऊ शकत नाही. पण कीर्तिरूपाने आपण अमर होऊ शकतो. माझ्या मनात ही अमर होण्याची इच्छा दडलेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मी काही राजा हरिश्चंद्र नाही, तरी ही  मला उमगलेले सत्य  मी माझ्या मित्राला सांगितले.....

काहीतरी भव्य दिव्य केले तर नामरूपी कीर्ति युगानुयुगे जिवंत राहते. श्रीरामांपासून ते गांधीजी पर्यंतच्या महान विभूतींची त्यांच्या कार्यांमुळे त्यांची नामरूपी कीर्ति अजूनही जिवंत आहे. आता निम्नवर्गीय परिवारात जन्मलेला, अभ्यासात बेताचा, बामुश्किले सरकारी कारकून झालेल्या माझ्या सारख्याला आयुष्यात आपण काही भव्य-दिव्य करू असे कधीच वाटले नाही. बाबा आमटे इत्यादी लोकांसारखी  समाजसेवा करण्याची इच्छाशक्ती ही नव्हती.  सारांश काही भव्य-दिव्य करणे मला शक्य नव्हते.
समाजात दुष्ट लोकांनाही प्रतिष्ठा मिळते. श्रीरामा बरोबर रावण ही अमर झाला आणि गांधी सोबत गोडसे ही. तुकाराम महाराजांनी म्हंटले आहेच  पुत्र व्हावा ऐसा गुंडा. त्याच्या तिन्ही लोकी झेंडा. आता माझ्या सारख्या सिंगल हड्डीच्या व्यक्तीकडून गुंडगिरी ही करणे शक्य नव्हते. शिवाय भित्रेपणाचे बाळकडूच मध्यम वर्गीय मराठी माणसाला जन्मापासून पाजले जातेच. ह्या मार्गावर जाणे ही शक्य नव्हते.

आता मेल्यानंतर कीर्तिरूपे उरणे शक्यच नव्हते. डॉक्टर, इंजिनीअर, इत्यादींचे नावे ही काही काळापर्यंत लोकांच्या लक्ष्यात राहतात. पण ज्या वेळी अभ्यास करायचा होता, केला नाही. ती वेळ केंव्हाच  निघून गेली होती. आता संसारात राहत असताना  थोडेफार समाज कार्य केले किंवा त्याचा दिखावा केला तर कमीत-कमी जिवंत असताना तरी आपले नाव काही लोकांच्या लक्ष्यात राहते. पण इथे ही लोचा झाला. एक तर सरकारी नौकरी आणि ती ही स्टेनोग्राफर,पीए आणि पीएस. येस येस करण्यात ३३ वर्षे निघून गेली. त्यात ही १८ वर्षे पंतप्रधान कार्यालयात.  सकाळी सातला घरून निघाल्यावर रात्री ९-११च्या दरम्यान घरी पोहचणे. गली-मोहल्ला आणि मंडळाचे दिखाऊ समाज कार्य तर सोडा घरची सर्वकामे सौ.च्या डोक्यावर टाकावी लागली. सद्य परिस्थिती अशी आहे गली-मोहल्यात ही मला माझ्या सौ.च्या नावाने किंवा मुलाच्या नावाने ओळखतात.


आता एकच मार्ग उरला होता, तो म्हणजे लेखकू बनणे. लेखक बनण्यासाठी काही भव्य-दिव्य करावे लागत नाही, मेहनत आणि अभ्यास ही करावा लागत नाही. फक्त मनातील कल्पना कागदावर उतरव्याच्या असतात.  वयाच्या पंचविसित लेखक बनण्याचा एक प्रयत्न केला होता. काही हिंदी/मराठी कविता, काही प्रतिष्ठित मासिकांमध्ये पाठविल्या होत्या. पण कोणीही तय छापल्या नहीं किंवा परत ही पाठविल्या नाही. फक्त पोष्ट्खात्याची  शंभर एक रुपयांची कमाई झाली. अखेर थकून-भागून कवी/ लेखक बनण्याचा नाद सोडून दिल्या.  आपले काही नाव होऊ शकत नाही, हे सत्य स्वीकार केले.

पण म्हणतातन एक मार्ग बंद झाला कि दुसरा उघडतोच. असेच पंचवीस वर्षे निघून गेले. २०१० मध्ये घरात इंटरनेट लावला. कदाचित् माझ्या सारख्या लोकांच्या मनातल्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्यासाठीच इंटरनेटचा जन्म झाला असावा.  या वेळेपर्यंत माझ्या मनात आपण मराठी आहोत, याचा स्वाभिमान ही जागृत झाला होता. इंटरनेटवर मी पाहिलेली पहिलीच साईट मराठीसृष्टी ही होती. या साईटमध्ये चक्क ‘आपल्यातला सुप्त लेखक जागवा’ असे आव्हान होते. आंधळा एक डोळा मागतो इथेतर दोन दोन डोळे ते ही मुफ्त में. प्रथम विश्वास झाला नाही,  भीत-भीत पहिला लेख गुगल देवाच्या मदतीने टंकून टाकला.  आश्चर्य म्हणजे पहिला टाकलेला लेख दुसर्याच दिवशी साईटवर दिसला. मग काय, मनातील दडलेली अमर होण्याची/ प्रसिद्ध होण्याची सुप्त इच्छा जागृत झाली. स्वत:चा ब्लॉग ही स्वतच्या नावानेच बनविला. जे जे मनात आले आणि टंकू लागलो. अंतर्जालावर भाषेची, व्याकरणाची, कसला ही विचार कारण्याची आवश्यकता भासली नाही. काही चूक असेल तर वाचणारे लगेच प्रतिसाद देऊन ती चूक दुरुस्त करतातच. चिंता करण्याची गरजच भासली नाही. काही महिन्यातच मराठीच्या इतर उदा. मिसळपाव, ऐसीअक्षरे, आणि नुकतेच ग्लोबल मराठी बाबत कळले. डोळेबंद करून आपला लेख सर्व ठिकाणी टाकू लागलो. अश्यारितीने मी ही अंतर्जालावर लिहिणाऱ्या हजारोंच्या संख्येत असलेल्या लेखकांच्या श्रेणीत समाविष्ट झालो. इंटरनेटवर लेखांची चोरी ही होते.  माझे काही लेख  ही  चोरी झाले. खंर म्हणाल, तर चोरी झाल्याचे कळल्यावर मला दुख होण्याच्या जागी कुठेतरी आनंदच झाला (बन्दे में कुछ दम है असे वाटले).

आजकाल तर दर आठवड्यात एक लेख/ कविता लिहिण्याचा संकल्प केलेला आहे. पाककृतीपासून ते न कळणाऱ्या गंभीर प्रश्नांवर ही लिहायला सुरुवात केली आहे. काहीही लिहिले तरी निदान ५००-१००० लोक वेगवेगळ्या मराठी साईटस् वर वाचतीलच. (मराठी लिहिलेली अधिकांश छापील पुस्तके ३०० लोक ही वाचत नाही).  एक मात्र खंर, निदान जेवढे दिवस आपण अंतर्जालावर लिहित आहोत, तेवढे दिवस तरी काही लोकांना आपले नाव लक्ष्यात राहील. निदान सध्यातरी कीर्तिरूपे उरण्याची दुधाची तहान ताकावर तरी भागते आहे. (असे निदान माला तरी वाटते).  तरीही प्रतिष्ठित लेखक समाज कधीतरी आपली ही दखल घेऊल अशी आशा आहे.   


Wednesday, July 22, 2015

वार्तालाप (२५) समर्थ विचार - दुसर्यांवर विश्वास/ ऑउटसौर्स


जो दुसऱ्यावरी विश्वासला
त्याचा कार्यभाग बुडाला.
जो आपणची कष्टात गेला
तोचि भला.
(दासबोध १९.९.१६)

[समर्थ म्हणतात - जो स्वत:च्या कार्यासाठी दुसर्यावर विसंबून राहतो त्याच्या कार्याचा नाश होतो, म्हणून जो स्वत: कष्ट करून कार्य तडीस नेतो, तोचि शहाणा समजावा].  

आजच्या पिढीचे ब्रीद वाक्य, आम्ही आमची अधिकांश कामे ऑउटसौर्स करून घेतो.  मोबाईल/ ऑन लाईन वरून सर्व कामे होतात. आम्हाला काहीही करावे लागत नाही. भाजीपाला, किराणा, कपडे, इलेक्ट्रॉनिक समान इत्यादी घरात लागणारे सर्व साहित्य, घरी बसल्या-बसल्या मिळतात.  

पण प्रत्येक कार्य ऑउटसौर्स करता येत नाही. ज्या कामांचे चांगले आणि वाईट परिणाम स्वत:च  भोगायचे असतात. ती कामे करण्यासाठी स्वत:च कष्ट करावे लागतात अन्यथा काय होते, या वरून एक जुनी कथा आठवली. 

पूर्वी  इक्ष्वाकु  वंशात सत्यव्रत नावाचा एक राजा झाला होता. त्याला सदेह स्वर्गात जायचे होते. आता स्वर्गात प्रवेश मिळवायचा असेल तर घोर तपस्या करावी लागते. राजा सत्यव्रताने सौपा मार्ग निवडला चक्क तपश्चर्या ऑउटसौर्स केली. ऋषी विश्वामित्र तपस्या करणार आणि सत्यव्रत स्वर्गात जाणार हे ठरले. या साठी राजा सत्यव्रताने किती सुवर्ण मुद्रा मोजल्या असतील, काही कल्पना नाही. एवढे मात्र खरे, ऋषी विश्वामित्र तपस्येला बसले आणि सत्यव्रताचे स्वर्गारोहण सुरु झाले.

आता परीक्षा देणारा एक आणि पास होणारा दुसरा, कुणालाही हे आवडणार नाही. आपल्या देशात परीक्षेत कॉपी करणाऱ्यां विरुद्ध कार्रवाई केली जाते. पोलीस कॉपी करणार्यांना अटक करतात.  देवांच्या राजा इंद्राला सत्यव्रताचा ऑउट सौर्सिंग प्रकार मुळीच रुचला नाही. आता विश्वामित्र सारख्या प्रतिष्ठित ऋषी आणि इक्ष्वाकू वंशाच्या बलाढ्य राजाच्या विरुद्ध बलप्रयोग करणे देवराज इंद्राला जमणे शक्य नव्हते. पण इंद्राजवळ अप्सरा रुपी ब्रह्मास्त्र भरपूर होते. त्यांचा वापर कसा करायचा हे ही इंद्राला चांगले माहित होते. इंद्राने मेनका नावाच्या अप्सरेला विश्वामित्रांची तपस्या भंग करण्याचा आदेश तिला.

मेनका विश्वामित्रांच्या पुढ्यात येऊन ठाकली.  रती समान सुंदर स्त्री समोर पाहून विश्वामित्र यांची विकेट उडाली. विश्वामित्र राजाला दिलेले वचन विसरून गेले. तपस्या अर्धवट सोडून, विश्वामित्रांनी मेनके सोबत संसार थाटला.  राजा सत्यव्रताची  गत तर ‘धोबी का कुत्ता घर का न घाट का’ सारखी झाली. अद्याप  ही  ते  न धड पृथ्वी वर, न धड स्वर्गात, अधांतरीच लटकलेले आहे. त्यांची स्वर्गात जाण्याची मोहीम पूर्णपणे फसली. 

दिल्लीत सोसायटी राहणारे बहतेक लोक (अधिकांश नौकरीपेशा वाले मराठी लोक) भाजीपाला सुद्धा  मोबाईल वर मागवितात. घरपोच भाजी बहुधा शिळी असते.  हे आळशी लोक चांगली भाजी म्हणजे काय हे ही विसरून गेलेले आहेत. (एकदा मी स्वत: एका मित्राच्या घरी आलेली संपूर्ण भाजी परत केली आणि त्यांना दुकानात घेऊन गेलो.  तेंव्हा त्यांना कळले कित्येक वर्षांपासून त्यांचा ओळखीचा दुकानदार त्यांना निम्न दर्जेची भाजी पुरवत होता आणि चांगल्या दर्जाचे पैशे घेत होता). त्या दिवसापासून ते स्वत: बाजारात जाऊन भाजी आणू लागले.  तसेच  ऑन लाईन मिळणाऱ्या अधिकांश वस्तूंचा दर्जा ही बहुतेक चांगला नसतो, मनासारखी ही नसते आणि पुष्कळदा जास्ती किंमत मोजावी लागते. 

आजच्या जगात दुसर्यावर विश्वास ठेवावेच लागतो. उदा: घर बांधायचे असेल तर ठेकेदारवर विश्वास ठेवावा लागतो.  पण एक लक्षात ठेवा. अंधारात कुणाला सोन्याचे नाणे दिसले, कुणी  पाहत नसेल तर शंभर पैकी नव्वद टक्के लोक सोन्याचे नाणे उचलतीलच. (स्वत:लाच विचारा). घराचा नक्शा पास करून घेणे, लोनची व्यवस्था, सरकारी अनुमती या बाबी स्वत:च बघाव्या लागतात. विटा, सिमेंट, लोखंड कुठे चांगले आणि स्वस्त: मिळते हे ही पाहावे लागते. ठेकेदार किती ही विश्वासू असला तरी आपल्याला जातीने उभे राहून कामावर लक्ष ठेवावे लागते. तेंव्हा कुठे घर मनाप्रमाणे आकार घेते. अन्यथा घराचे स्वप्न, स्वप्नच राहण्याची शक्यता जास्त. दुसर्यांवर अवलंबून राहायचे असले तरी कामावर लक्ष हे ठेवावेच लागेल. त्या साठी थोडे कष्ट ही करावे लागतील.

ह्याच प्रमाणे परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास करावाच  लागतो, धन-संपती कमविण्यासाठी मेहनत ही करावीच लागते.  सत्यव्रताने स्वत: तपस्या केली असती तर निश्चित ते स्वर्गात गेले असते. 

सारांश एकच, प्रपंचातील कामे असो किंवा परमार्थ साधण्याचा मार्ग, कार्याची पूर्ती करण्यासाठी आपल्याला स्वत:च कष्ट करावेच लागतात. तेंव्हाच कार्य तडीस जाते. समर्थांच्या शब्दातच,

व्याप आटोप करती
धके-चपटे सोसती
तेणे प्राणी सदेव होती
देखता देखता.
(दासबोध १५.३.७)

Sunday, July 19, 2015

स्वच्छतेचा चष्मा- एक रूपक कथा


सिंहासनावर विराजमान महाराज विक्रमाचे डोके भडकलेले होते. आज सकाळी त्यांनी सहज म्हणून अवंती नगरीचा फेरफटका मारला.  नगरात जागो-जागी कचर्याचे ढिगारे आणि घाणीचा उग्र वास पसरलेला होता. कसे राहतात आपले प्रजाजन डुक्करांसारखे या घाणीत, सहन होत नाही मला. आता असे  चालणार नाही. काही ही करा  मला पुन्हा कधी नगरीत घाण  दिसता कामा नये. पण एक लक्षात ठेवा, प्रजेला आर्थिक स्वरूपाचा काही त्रास झाला नाही पाहिजे आणि सरकारी तिजोरीला ही फटका बसला नाही पाहिजे. प्रधानमंत्री म्हणाले असेच होईल महाराज.

दुसर्या दिवशी प्रधानमंत्रीनी, महाराजांसमोर एक चष्मा  पेश केला आणि  म्हणाले महाराज हा चष्मा खास इंद्रप्रस्थ नगरीतून महाराज युधिष्ठिर यांनी पाठविला आहे. हा चष्मा घातल्यावर तुम्हाला कुठेही घाण दिसणार नाही किंवा घाणीचा वास ही येणार नाही. 

महाराज विक्रमादित्यांनी चष्मा डोळ्यांवर चढविला. अवंती नगरीत फेरफटका मारला. त्यांना कुठे ही घाण दिसली नाही किंवा घाणीचा  वास ही आला नाही. महाराज प्रसन्न झाले.  

स्वामी त्रिकाळदर्शी म्हणतात, ज्याला या कथेचा अर्थ समजेल, त्याचे घर नेहमीच स्वच्छ राहील.


Thursday, July 16, 2015

माझी अधिकमासी पाककृती खास जावयासाठी -पनीर वेज बिन्दापुरी


आपल्या इथे अधिक मासात जावयाला वाण देण्याची पद्धत आहे. गेल्या रविवारी लेक-जावयाला जेवायला बोलविले होते. शनिवारी रात्री सौ.ने अनरसे केले होते. (किमान ३३ अनरसे तरी जावयाला द्यायचे असतात, ते ही एका तांब्याच्या किंवा पितळेच्या डब्यात).  साहजिक आहे चिवडा ही केला होता. रविवारी सकाळी सौ.ने सहज म्हंटले,  मी केलेल्या  पाककृती तुम्ही आपल्या नावाने खपवितात.  आज लेक- जावई येणार आहे. त्या साठी तुम्हीच  डिश बनवा.   मी ही म्हणालो त्यात काय आहे, मला ही चांगले पदार्थ बनविता येतात, तू बघच.  त्यावर सौ. म्हणाली साधी- सौपी पनीरची भाजी करा. काल संध्याकाळीच बाजारातून  अर्धा किलो विकत घेतले आहे. टमाटर, कांदे आणि शिमला मिर्च ही आहे.  तेवढ्यात लेकीचा फोन आला. बहुतेक तिच्या आईने तिला आज बाबा रेसिपी बनविणार आहे याची कल्पना दिली असेल. ती म्हणाली, बाबा नेहमी सारखी पंजाबी स्टाईल पनीरची भाजी बनवू नका, काही तरी वेगळ बनवा.  विचार करू लागलो आणि एक नवीन कल्पना सुचली. पनीर, टमाटर, कांदे आणि शिमला मिरची (ढोबळी मिरची) वापरून भाजी करायचे ठरविले. 

आता भाजीचे साहित्य बघू. अर्धा किलो पनीरचे चौकोर आकाराचे तुकडे कापून घ्या. ४ टमाटर मध्यम आकाराचे, प्रत्येक टमाटरचे ६ भाग करून घ्या. कांदे ही थोडे जाडसर कापा. शिमला मिरचीचे ही थोडे मोठे आकाराचे तुकडे करा. या शिवाय ३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या. अर्धा ईंच आले बारीक चिरून घ्या.  खालील चित्रात चिरलेली भाजी दाखविली आहे.




या शिवाय  विनेगर , टमाटर   सोया  साॅस, काळी मिरीची पावडर आणि जिरे ही वापरले.





भाजी करतानाचा माझा फोटो. 




कढई गॅस वर ठेऊन  गैस मध्यम ठेवा.  आधी चार टेबल स्पून तेल टाका, तेल गरम  झाल्यावर एक लहान चमचा जिरे, चिरलेली मिरची आणि आले टाका. नंतर कांदे टाका. दोन एक मिनिटे कांदे परतल्यावर टमाटर आणि पनीर घालून  एक-दीड मिनिटे परता. (आपल्याला टमाटर  ची ग्रेवी करायची नाही आहे, म्हणून टमाटर पनीर सोबत टाकले) नंतर त्यात चिरलेली शिमला मिरची, एक मोठा चमचा काळी मिरी पूड, दीड चमचे सोया साॅस, २ चमचे विनेगर, ४-५ चमचे टमाटर साॅस आणि स्वादानुसार मीठ टाकून भाजी व्यवस्थित परतून घ्या, नंतर कढई झाकण ठेवा. २ मिनिटानंतर झाकण काढून, पाणी सुटले असेल तर गॅस मोठा करून एक-दीड मिनिटे भाजी परतून घ्या आणि गॅस बंद करा.  भाजी खालील चित्रा प्रमाणे दिसेल.  




मी केलेली ही  भाजी सर्वांना  आवडली. भाजीला  काळीमिरी, सोया   साॅस आणि आले टाकल्यामुळे एक वेगळा स्वाद  आला होता. (थोडा सलाड  सारखा)  जर तुम्हाला तिखट, चरमरीत आवडत असेल तर जास्त हिरव्या मिरच्या टाकू शकतात

मी दिल्लीत  बिंदापूर या गावा जवळच्या  बिंदापूर एक्स. या कॉलोनीत  राहतो म्हणून भाजीला हे नाव दिले आहे.
 
टीप: (इथे एक गोष्ट नमूद करणे गरजेचे. शिमला मिरचीत बिया फार असतात, आपण त्या भाजीत वापरत नाही. शिमला मिरची विकत घेताना, दोन एका आकाराच्या मिरच्या हातात घेऊन पाहाव्या जी कमी वजनाची असेल ती निवडावी. अश्या रीतीने भाजी विकत घेतली तर अध्या किलोत 2-३ मिरच्या सहज जास्त बसतात).

मी केलेली पोहे-मुरमुरे भेळ




Tuesday, July 14, 2015

मोड आलेल्या मुगाची उसळ



शनिवार, दिनांक ११.७.२०१५ 

तीन दिवसांपासून दिल्लीत रोज पाऊस पडत आहे.  परवा रात्री मूग भिजत टाकले होते. काल कपड्यात बांधून ठेवले.  काल संध्याकाळी पाऊस सुरु असल्यामुळे शुक्र बाजार लागला नाही. आज सकाळ पासून ही रिमझिम पाऊस सुरु आहे. पण घरात उसळीला लागणारे  साहित्य कांदे, टमाटर, आले, लसूण इत्यादी होते. मुगाला मोड मस्त आली होती. अश्या पावसाळी वातावरणात गरमागरम उसळ खायला कुणाला ही आवडेल.  सौ.ने मोड आलेल्या मुगाची उसळ केली  त्याचीच कृती खाली देत आहे. (सौ.ची तक्रार आहे, तिच्या केलेल्या रेसिपी मी आपल्या नावाने टाकतो. तिचे श्रेय तिला मिळालेच पाहिजे, अन्यथा .... आणखीन काय सांगणे... बाहेरचा वाघ घरात शेळीच असतो). असो.

 साहित्य: मोड आलेले मूग, कांदे मध्यम आकाराचे ३, टमाटर ३, हिरवी मिरची ३-४, लसूण ७-८ पाकळ्या, आले अर्धा ईंच, हिंग, मोहरी, हळद, काळी मिरी पूड, जिरे पूड प्रत्येकी १ छोटा चमचा,  तिखट आणि धने पूड २ छोटे चमचे, तेल  आवश्यकतेनुसार , मीठ चवीनुसार. 



कृती: आधी मोड आलेले मूग पाण्यातून अलगद काढून घ्या थोडा बहुत कपड्याचा वास लागला असेल तरी निघून जातो.  कांदे आणि टमाटर आणि कोथिंबीर बारीक कापून ठेवा. मिरची, आले-लसूणची पेस्ट करून घ्या.  


गॅस कढईत तेल टाका. तेल गरम झाल्यावर मोहरी मोहरी टाका, मोहरी तडतडल्यावर हिंग टाका. नंतर आले-लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट टाका. एक मिनिटानंतर चिरलेले कांदे घालून थोड परतून घ्या नंतर त्यात काळी मिरी, जिरे आणि धने पूड आणि मोड आलेले मूग घाला. कढईवर झाकण ठेऊन, गॅस मध्यम करून ५ मिनिटे वाफ काढून घ्या.  आता झाकणउघडून, बारीक चिरलेले टमाटर घाला (पावसाळ्यात कांदे, टमाटर उसळी वर वरतून घालण्यापेक्षा शिजताना टाकलेले जास्त चांगले) आणि चवीनुसार मीठ टाकून उसळ परतून घ्या. पुन्हा २-३ मिनिटांसाठी झाकण ठेवा. गॅस बंद करा. 


वरतून कोथिंबीर टाकलेली स्वादिष्ट गरम-गरम उसळ  रिमझिम पाऊस बघत खाताना मस्त लागते.    

Friday, July 10, 2015

कोफ्ते इन ग्रीन ग्रेवी



हिंदी अंग्रेजीचा तडका असलेले भाजीचे नाव वाचताना तुम्हाला किती छान वाटले असेल.  कालचीच गोष्ट आमचे चिरंजीव म्हणाले मिळमिळीत भाजी कुणाला ही खायला आवडत नाही, तसेच भाजीचे मिळमिळीत नाव बघून कुणी रेसिपी वाचणार नाही. आता या भाजीचे मराठी नाव 'दुधीचे भजे हिरव्या रस्यात' असे काही तरी  ठेवले असते, तर बहुतेक खादाड खाऊ लोकांनी भाजीची रेसिपी वाचण्याचे कष्ट घेतले नसते. असो.

दुधी आणि पालक दोन्ही भाज्या पोष्टिक असतात पण बहुतेक मुलांना (त्यात मोठे ही असतात) खायला आवडत नाही. पण 'कोफ्ते इन ग्रीन ग्रेवी' ही  भाजी घरातील लहान मोठे सर्वाना निश्चित आवडले.  

मुख्य साहित्य: अर्धा किलो कोवळी  दुधी  आणि  अर्धा किलो  पालक. 

आधी पालकाला व्यवस्थित धुवा. गॅस वर कढई ठेऊन त्यात पालक टाकून झाकण ठेवा. (पाणी चुकून सुद्धा टाकू नका)  ३-४ मिनिटे झाल्यावर गॅस बंद करा.  एका ताटात पालक काढून थंड करा. नंतर मिक्सर मधून काढून छान हिरवी पेस्ट तैयार करून घ्या.

दुधी किसून घ्या.  एका भांड्यात कीस टाकून त्यात स्वादानुसार तिखट, मीठ, हळद, गरम मसाला, धने-जिरे पूड,  बेसन (३-४ मोठे चमचे) आणि १/२ छोटा चमचा खाण्याचा सोडा  टाकून घट्ट मिश्रण तैयार करा. (यात ही पाणी टाकू नका, मीठ टाकल्यावर दुधीला पाणी सुटतेच). 

कढई तेल टाकून छान ब्राऊन कोफ्ते तळून घ्या.  तळलेले कोफ्ते आणि पालकाची पेस्ट अशी दिसेल.



फोडणी:  कांदे २ मध्यम आकाराचे, टमाटर ३ मध्यम आकाराचे, लसूण ५-६ पाकळ्या, आले १/२ ईंच, हिरवी मिरची ३-४ मिक्सरमध्ये मध्ये टाकून पेस्ट तैयार करून घ्या (सर्व पदार्थांची एकत्र पेस्ट केली तरी स्वादात काही फरक पडत नाही. वेळेची बचत मात्र होते). आता कढईत तेल टाकून गॅसवर ठेवा. तेल गरम झाल्यावर नेहमी प्रमाणे मोहरी टाका. मोहरी तडकल्यावर१/२ छोटे चमचे हिंग टाका. नंतर तैयार केलेली  कांदे- टमाटर इत्यादीची पेस्ट त्यात घाला. तेल सुटू लागल्यावर, हळद (१/२ छोटा चमचा), गरम मसाला (१छोटा  चमचा, धनिया पावडर (२ छोटे चमचे) आणि  स्वादानुसार तिखट टाका. एखाद मिनिट परतून, त्यात पालकाची हिरवी पेस्ट  घाला. ही पेस्ट  ही २-३ मिनिटे परतून घ्या. नंतर  अंदाजे १-२ वाटी पाणी घालून (गरजेनुसार) त्यात चवीनुसार मीठ घाला. एक उकळी आल्यावर आधी तळलेले कोफ्ते घाला.  १-२ मिनिटानंतर गॅस बंद करा.  अश्यारितीने कोफ्ते इन ग्रीन ग्रेवी तैयार होईल. भाजी कशी दिसेल याचा अंदाज खालील दिलेल्या चित्रावरून कळू शकेल. दुधी आणि पालक न खाणारी मुले ही भाजी आनंदाने खातील.  


(टीप: ही भाजी सौ.ने केली होती, मी फक्त कशी केली त्याचे वर्णन करीत आहे) 



भाज्यांचे लोणचे



Sunday, July 5, 2015

चंदाची प्रेम कहाणी



चंदाचे ऑफिस नवी दिल्लीत कश्मीर हाउसच्या जवळ होते. चंदाला चांगलेच आठवते, तो शुक्रवारचा दिवस होता. त्याचाच कार्यालायातली ती म्हणजे चांदनी पहिल्यांदाच त्याच्या केबिन मध्ये त्याला भेटायला आली. चांदनीला ऑफिसमध्ये सर्व ऐश्वर्या राय म्हणायचेमध्यम बांधा, गोरा रंग, मोठे डोळे, सोनेरी लांबसडक केस आणि माधुरी दीक्षित टाईप कोलगेट स्माईल. कोण फिदा नाही होणार तिच्यावरत्याच्या सारखे कित्येक तिच्यावर लाईन मारण्याचा प्रयत्न करायचे. पण ती कुणालाच भाव द्यायची नाही. तिला पाहताच चंदाच्या हृदयाचे ठोक वाढले.  त्याच्या तोंडून एवढेच निघाले, काय सेवा करू आपली. ती आपल्या पांढर्याशुभ्र दंतपंक्ती दाखवत म्हणाली, सहजच आली होते, आज मला थोड लवकर जायचे होते, पण वाजताच आधी इथून निघणे शक्य नाही.  मला कळले आहे, तू बाईक विकत घेतली आहे.  हरकत नसेल तर मला मंडी हाऊसच्या मेट्रो स्टेशन पर्यंत आपल्या बाईकनी सोडशील का? प्लीss.  चंदाची तर विकेटच उडाली. 'अंधा मांगे एक आंख, आणि इथे तर दोन-दोन मिळतात आहे. तो तिला म्हणाला, त्यात कायहे तर माझे सौभाग्य. ती थोड लाजतच म्हणाली, मग ठीक आहे, मी पाच वाजता येते. 

चंदा तर आता हवेवर तरंगू लागला. गेल्या शनिवारीच त्याने बाईक विकत घेतली होती. त्याच्या वडिलांनी शनिवारी बाईक घेऊ नये (लोखंडाची असल्यामुळे) हा उपदेश केला होता. त्याने काही आपल्या वडिलांचे ऐकले नाहीदिल्लीत एक म्हण आहे, 'बाईक हो पास तो कुडी मिलेंगी  हजार'. चंदाने विचार केला, एकदा का सोनी कुडी बाईकवर बसलीमग  तिला गटवायला कितीसा वेळ लागणार. आज ती त्याच्या सोबत बाईकवर बसणार होती. तिच्या ओझरत्या स्पर्शाच्या कल्पनेनेच  चंदाचे सर्वांग रोमांचित झाले. त्या दिवशी घरी परतल्यावर चंदाने आपला चेहरा आरश्यात बघितला. दिसायला तो ही ठीकठाक होता. पण म्हणतातन 'एक नूर आदमी आणि दस नूर कपडा". तिला पटवायला आपल्याला ही स्मार्ट आणि सुंदर दिसले पहिजे. संसाराचे सुंदर चित्र त्याच्या डोळ्यांसमोर उमटले.  ती ही सरकारी कर्मचारी, तो ही सरकारी कर्मचारी, दोघांचा पगार सारखाच. तिला पटविले तर काय मस्त राजा-राणीचा संसार होईल.. 

मासोळी जाळ्यात अडकविण्यासाठी चारा तर फेकावाच लागतो.  तिच्या नजरेत सुंदर आणि स्मार्ट दिसण्यासाठी काही इन्व्हेस्टमेंट तर करावीच लागेल. शनिवारीच सकाळी उठून सेलून मध्ये जाऊन हिरो सारखी हेअरस्टाईल करून घेतली. मालमध्ये  जाऊन काही डिजाईनर कपडे  एक  दहाहजाराचा स्मार्ट फोन विकत घेतला. कुडीवर इम्प्रेशन  पडले पाहिजे ना,तरच तर ती चारा खाणार. 

सोमवारी ऑफिसमध्ये आल्यावर सर्वांची नजर त्याचावरच होती. तो ही तिची वाट पाहत होता. दुपारी वाजताच्या दरम्यान ती, त्याच्या केबिनमध्ये आली. त्याला पाहताच म्हणाली, 'क्या बात है, आज तो एकदम हिरो लग रहे  हो' चंदाने ही लगेच उत्तर दिले, हिरो हूँ तो हीरो लगूंगा हीआज  शाम को भी छोडना है  क्याचांदनीने मान डोलावली आणि म्हणाली आज पण थोड लवकर जायचे आहे. चंदाने मौक्याचा फायदा उठविला तो लगेच म्हणालाआजही सोडून देईल, चहाचा टाईम झालाच आहे, एक कप चहा माझ्या सोबत घेईल का.  ती ही लगेच म्हणाली, तू  रोज सोडणार असेल तर मला एकदा काय दहा वेळा तुझ्या सोबत चहा घ्यायला हरकत नाहीत्या दिवशी पहिल्यांदाच चंदाने तिच्या सोबत केंटीन मध्ये चहा घेतला.  आजूबाजूला बसलेले बाबू त्याला घूरून पाहत होते. यांनाआपल्याकडे  घूरताना पाहून चंदाची  छातीही ५६ ईंच चौडी झाली. त्याला वाटलेमासोळी गळाला लागली.

पुढचे १०-१५ दिवस असेच निघून गेले. तो तिला सोडायलामंडी हाऊस पर्यंत जायचा.  सरकारी कार्यालयात कुठलीही गोष्ट लपून राहत नाही. तिळाचे ताड बनायला इथे वेळ ही लागत नाही. चांदनीच्या मैत्रीणीनीं ही तिला चंदाचे नाव घेऊन चिडवू लागल्या होत्या. एक दिवस चांदनी, पर्स उघडून एक फोटो एकटक लाऊन पाहत होती. तिचे लक्ष इतरत्र कुठे ही नव्हते. तिची मैत्रीण, सुमन तिच्या जवळ आली, आणि तिच्या मागे उभी राहून ती ही तो फोटो निरखून बघू  लागली. अचानक ती, म्हणाली, हा तर चंदाचा फोटो नाही. चांदनी भानावर आली, आणि सुमनला उद्देश्यून  म्हणाली,  मलाचंदाचा फोटो पर्स मध्ये ठेवायचे काही कारण आहे का? तो फक्त माझा मित्र आहे, सहकर्मी आहे. तो गेल्या पंधरवड्यापासून  मला मंडी हाऊस पर्यंतची लिफ्ट देतो,  थोड हसून बोलून घेते त्याच्याशी. सुमनमग हा फोटोवाला  कोण आहे. आणखीन किती  मजनूंना  तू अशी झुलवते  आहे. चांदनी आपले डोळे वटारत तिला म्हणाली, मला काय समजते तू, हे तुझे होणारे जिsजाजी आहेत.  सूरज नाव  आहे त्याचं.  मोठ्या कंपनीत इंजिनिअर आहेत. सी.पी.ला ऑफिस आहे त्याचं.  पर्स मधून सोन्याची एक अंगठी दाखवत चांदनी म्हणाली, ही बघ आमच्या साखरपुड्याची अंगठी. सुमनला हसूच आले, अच्छा, तर रोज संध्याकाळी सी.पी.ला जाऊन सूरजला भेटते. त्यासाठी चंदाकडून लिफ्ट घेते. ग्रेटच आहे तू, पण चंदाला कळल्यावर त्याचे काय होईल.  चांदनी  म्हणालीथोडे दिवस थांबलग्नाची तारीख निश्चित होऊ दे, सर्वांना सांगणारच आहे मी. त्या बिचार्या मजनूला ही. हा!हा! हा! दोघीही जोरात हसल्या.

तो शनिवारचाच दिवस होता, संध्याकाळी काही कामाने चंदा  सी.पी. आला होता.  चंदाच्या मनात विचार आलाबघू या प्रेमी-प्रेमिका सी.पी.च्या सेन्ट्रल पार्क मध्ये बसून काय करतात  ते.  एखाद्या संध्याकाळी चांदणीला ही इथे घेऊन येऊ.  आपण तिच्यावर प्रेम करतो, हे सांगण्यासाठी सेन्ट्रल पार्कपेक्षा चांगली जागा दुसरी कुठली. आपल्या स्वप्नील विचारात दंग असताना, अचानक त्याची नजर एका जोडप्यावर पडलीअमलतासच्या झाडा मागे ते दोघ आलिंगनबद्ध, चुंबनरत होते. लोक आपल्याकडे पाहत असतील त्याची त्यांना पर्वा  नव्हती. त्या जोडप्याला पाहताच चंदा  दचकलाच,  त्याने एका झाडाची ओट घेतली. तो त्यांना निरखून बघू लागला. चांदनीच, हो चांदनी त्या पुरुषा बरोबर आलिंगन बद्ध होती. त्याचे डोके गरगरले, भडकलेविचारचक्र सुरु झाल, अच्छा तर  ही याला भेटायला रोज इथे येते, त्या साठीच माझ्याकडून लिफ्ट घेते. ती सी.पी. पर्यंतची लिफ्ट पण घेऊ शकत होतीकदाचित मला अंधारात ठेवण्यासाठी मंडी हाउस पर्यंतचीच लिफ्ट घेते. मंडी हाउस पासून सी.पी.ला मेट्रोनी येत असेल याला भेटण्यासाठी. आपला तर चक्क  चांदनीने  ड्राइवर सारखा वापर केला. किती मूर्ख आहे मी. त्याला त्याचीच लाज वाटली. त्याला वाटले, आत्ताच जाऊन चांदनीला जाब विचारावापण तो थबकला.   चांदनी तर त्याला मिळणार नाहीचउगाच शोभा होईल.  त्याचे स्वप्न भंग झाले होते.  भारी मनाने तो घरी परतला. 

दुसर्या दिवशी चांदनी  नेहमीच्या वेळी अर्थात दुपारच्या चहाचा वेळी, त्याच्या केबिन मध्ये आली. त्याने काही दर्शवले नाही. केंटीन मध्ये गेल्यावर चहा पिणे झाल्यावर तो तिला एवढेच  म्हणालाचांदनी, मी आज बाईक आणली नाही किंवा आता कधीच आणणार नाही. तू दुसरा ड्राइवर आपल्यासाठी शोधून घे. मला काय म्हणायचे आहे तू समजली असेलच.  पुन्हा कुणाच्या जीवाशी असे खेळ खेळू नकोस  म्हणत तो, तिच्या उत्तराची वाट पाहता आपल्या केबिनमध्ये परतला.

चांदनी काही क्षण चंदा कडे पाहत राहीली. बेचारा... आज उद्या हे होणारच होत... ती पुटपुटली.  आज काही सूरजला भेटता येणार नाही. बसने पाऊण एक लागतो सी.पी. पर्यंत जायला.  रोज-रोज घरी पोहचायला उशीर करणे ही योग्य नाही. अजून काही लग्न झालेले नाही.  तिने फोन लावलासूरज बहुतेक त्या मजनूने आपल्याला सी.पी. बघितले असावे.  आता लिफ्ट मिळणे शक्य नाही.  मला ही तुला आज  भेटणे शक्य होणार नाही. आपल्याला भेटायचे असेल तर तुलाच काही उपाय करावा लागेल
.