Saturday, December 27, 2014

बंदुकीची गोळी आणि ती


(काल्पनिक कथा)

तीन-चार वर्षांपूर्वीची गोष्ट नागपूरहून दिल्लीला येत होतो. सेकंड एसीच्या डब्यात साईडच्या दोन जागांपैकी एक  जागा मिळाली.  समोरच्या सीट वर  एक दाक्षिणात्य माणूस होता. ओळख झाली. त्याचे नाव मेथ्यु होते. अर्थातच केरळ प्रदेशातला. तो एका अर्धसैनिक दलात मध्यम श्रेणीचा अधिकारी होता. मी ही त्याला आपला परिचय दिला. बोलता-बोलता सहजच नक्षलवादचा विषय निघाला. मी ही सरकारी कर्मचारी असल्यामुळे निसंकोच मेथ्यु यांनी स्वत: बाबत माहिती सांगितली. गेली पाच-सहा वर्षांपासून नक्षल  प्रभावित भागात त्यांची पोस्टिंग होती. कित्येक चकमकीत ही भाग घेतला होता. मी म्हणालो, अर्ध सैनिकादलांमुळे आज नक्षलवाद काबूत आहे. तुम्ही ही बर्याच  नक्सलवाद्याना  कंठस्नान घातले असतील. त्यावर मेथ्यु  म्हणाला,  कुणाचे ही प्राण घेण्यात बहादुरी नाही, लोकांचे प्राण घेऊन आनंद ही मिळत नाही. मग तो शत्रू का असेना.  'बंदुकीची गोळी फक्त प्राण घेते आणि लोकांचे आयुष्य उध्वस्त करते'. बंदुकीची गोळी कुठल्या ही समस्येचे समाधान नाही. एका अर्धसैनिक दलाच्या अधिकारीच्या तोंडून हे ऐकून मला काहीसे आश्चर्य वाटले. चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले.  माझा मनात चाललेला गोंधळ मेथ्युचा ध्यानी आला. तो म्हणाला साहेब, तीन एक वर्षांपूर्वीची घटना आहे.  १५  शिपायांची  तुकडी घेऊन गस्त घालायला निघालो. जंगलातून  पायवाटेवर चालताना बलवान सिंग आणि मोहन हे दोघे सिपाही पुढे होते. मी, होशियार सिंग थोड्या अंतरावर त्यांच्या मागे. एका वळणावर  बंदुका घेतलेले सैनिकी वेशात तीन लोक बलवान सिंहला दिसले. तो थोडा गोंधळला, ते तिघे नक्षली होते. आपल्या समोर अर्धसैनिक दलाची तुकडी आहे, त्यांची संख्या आपल्यापेक्षा जास्त आहे. त्यांना एक धक्का देऊन इथून पलायन करणे उचित, त्यांच्या म्होरक्याने निमिषातच निर्णय घेतला. त्यांनी समोर दिसणाऱ्या दोन्ही शिपायांवर आपल्या एके ४७ ने ब्लास्ट (सर्व गोळ्या एकाच वेळी) केला. काही समजण्या आधीच बलवान आणि मोहन जमिनीवर पडले. मी लगेच एका झाडाची आड घेतली आणि आम्ही नक्षलींच्या दिशेने गोळीबार सुरु केला. होशियार सिंगने याने  थोड रांगत पुढे जाऊन एक हेंड ग्रेनेड त्यांच्या दिशेने फेकला. तो ग्रेनेड बरोबर त्यांच्या मध्ये जाऊन पडला. काही क्षणांकर्ता नक्षली गोंधळले. त्यांनी आपली पोजिशन सोडली आणि त्याच क्षणी ग्रेनेडचा ही ब्लास्ट झाला. सर्वकाही शांत झालं.  माझे  दोन शिपाई  शहीद झाले  होते. बाकी इतर कुणाला ही कुठलीच इजा झाली नव्हती. शिपायांना नक्षली जिवंत आहे कि मेलेले याची खात्री करायला सांगितले. होशियार सिंहाने परत येऊन सांगितले,  साहिब एक जिंदा है, क्या करें उसका. मी जवळ गेलो, बघितले  जेमतेम  १७-१८ मुलगी असेल.  दोन्ही पाय ब्लास्ट मुळे जखमी झाले होते. पाठीला गोळी ही  लागलेली होती. शरीरातून रक्त वाहत होते. एक  शिपाई  म्हणाला, साहब इसे तो उठाकर ले जाना पड़ेगा. मी विचार केला. जंगल नक्सलीनी भरलेले आहे. कदाचित या चकमकी बाबत त्यांना कळले ही असेल. आधीच दोन शहीद  शिपाई, त्यांची आणि नक्षली त्यांचे शस्त्र. ६-७ शिपाई तर या साठीच लागतील. उरलेल्या ५-६ शिपायांवर  सर्वांच्या संरक्षणाची जवाबदारी. निर्णय घेतला. आपल्या जवळ लोक नाही. सध्यातरी हिला इथेच सोडावे लागेल, नंतर येऊन बघू, काय करायचे ते. साहेब अश्यानी ही काही वेळातच इथेच तडफडून मरेल, एक शिपाई म्हणाला.  मी म्हणालो, ठीक आहे, मी तिला मुक्त करतो. मी तिच्या जवळ गेलो.एक पाय तिच्या छातीवर ठेवला आणि  तिच्या कपाळावर नेम धरला. त्या वेळी तिच्या चेहर्याकडे लक्ष गेल. मोठ्या डोळ्यांनी ती माझ्याकडे पाहत काहीतरी बोलण्याच्या प्रयत्न करत होती. मन घट्ट करून मी गोळी झाडली. त्या क्षणी माझ्या कानात आवाज घुमला  'साहेब मला का मारले, मला जगायंच होत.' 

मेथ्यु काही क्षणासाठी थांबला. तो पुढे म्हणाला, बलवान सिंहच्या बायकोचे वय फक्त तीस वर्ष होते त्यात तीन मुली. तिला पुढील सर्व आयुष्य तीन मुलींना वाढवत वैधव्यात काढावे लागणार. मोहन तर फक्त २२ वर्षांचा होता. आपल्या आई-बापांचा एकुलता एक. ती मुलगी, दोन वर्षांपूर्वी तिने दहावीचा पेपर दिला होता. तिला डॉक्टर बनायचे होते.  तिचा मोठा भाऊ कालेजात शिकत होता. उन्हाळ्याच्या सुट्टीत  घरी आला होता. त्याच वेळी जवळच्या गावात पोलीस पोस्टवर नक्षली हमला झाला. जवळपासच्या गावातल्या तरुणांना पोलिसांनी उचलले. त्यात तिचा भाऊ ही होता. असे गावकर्यांचे  म्हणणे. नंतर कळले पोलीस एन्काऊंटर मध्ये काही नक्षली मारल्या गेले त्यात तिचा भाऊ होता. भावाचा बदला घेण्यासाठी तिने जंगलाचा रस्ता धरला आणि चकमकीत मी तिला मारले. तिच्या वडिलांनाही या घटने नंतर पोलीस उचलून घेऊन गेले. कदाचित अद्यापही ते जेल मध्ये असतील. काही क्षणांच्या चकमकीत अनेकांचे  स्वप्न भंगले, काही परिवार उध्वस्त झाले. 

बाकी माझे म्हणाल, तर मी झोपेच्या गोळ्या घेतो  तरी ही मला झोप  लागत  नाही. जरा डोळे मिटले कि  तिचा चेहरा समोर येतो, एकच  आवाज कानात घुमत राहतो. 'साहेब मला का मारले, मला जगायचं होत.'  काय उत्तर देणार मी तिला. मला नेहमीच  वाटते, ती सतत माझ्या अवती-भोवती असते, कदाचित या क्षणी ही इथेच  असेल. जो  पर्यंत तिला  तिच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळणार नाही ती जाणार नाही. जन्म भर ती मला अशीच छळत राहणार. मेथ्युची कथा ऐकून मी सुन्न झालो. काहीच बोलू शकलो नाही. 

Thursday, December 25, 2014

ओळखा पाहू ?


टक्कल डोक्याला 
चष्मा डोळ्यांना
बाळ माझा 
होईना मोठा.

जिथे जातो 
तिथे पडतो 
आधार ताईचा 
वाटतो घ्यावा.

मी कोण?

Saturday, December 20, 2014

शोध थंडीच्या मीटरचा


तापमान मोजण्याच्या यंत्रा बाबत तर सर्वाना माहित आहे, पण थंडीचे मीटर हा काय प्रकार आहे, कुणी शोध लावला  आणि याने थंडी कशी काय मोजतात, ही उत्सुकता मनात जागृत होणारच. जीवाची मुंबई या महानगरात आमचे एक जिवलग (?) नातेवाईक राहतात.  बेचारे सीधे-साधे सरळमार्गी चालणारे, सरकारी कर्मचारी. सकाळी नऊ वाजता घरातून नौकरीसाठी प्रयाण करणारे आणि संध्याकाळी घरातल्या भिंतीवर लटकलेल्या घड्याळानी साडेपाचचा टोळा देत्याच क्षणी, घरात पुनरागमन करणारे. एकदम  शिस्तबद्ध सरकारी कर्मचारी सारखी त्यांची साधी राहणी. अर्धा डिसेंबर उलटताच मुंबईत गुलाबी थंडी पडते. पण मुंबईत पडणार्या या गुलाबी थंडीचा, संध्याकाळच्या गुलाबी वातावरणात, गुलाबी अनुभव घेण्याचा प्रयास संपूर्ण आयुष्यात त्यांनी कधी केला नव्हता. पण मुंबईकरांना भगवंतानी मोठ अर्थात सुपीरिअर माइंड दिल्या मुळे त्यांनी 'थंडीच्या मीटरचा' शोध लावला. त्याचीच ही कथा. 

चार-पाच दिवस आधी दिल्लीत ढगाळ वातावरण होत. पाऊस पडत होता. दिवसाचे तापमान कमाल १६ आणि किमान १४ डिग्री होते. दुसर्या दिवशी आभाळ स्वच्छ झाल, सकाळी चहूकडे धुकं पसरले आणि पारा  खाली पडला. थंड वाऱ्यामुळे शरीरात हुडहुडी भरली. मला थंडीच्या मीटरचा शोध लावणाऱ्या मुंबईकर नातलगाची आठवण झाली. 

काही सरकारी कामानिमित्त त्यांना दिल्लीत यायचे होते. त्या पूर्वी दिल्लीत कधी ही आले नव्हते, कदाचित मुंबईच्या बाहेर ही ते कमीच फिरले असेतील. त्या वेळी सुद्धा, असेच काही वातावरण होते. शुक्रवारी ढगाळ वातावरण होते, पाऊस पडला होता. शनिवार आकाश स्वच्छ झाले. पहिल्यांदाच ते दिल्लीत येत असल्यामुळे रविवारी सकाळी त्यांना घ्यायला मी नवी दिल्ली स्टेशनवर गेलो.  थंडगार वारे सुरु असल्यामुळे धुंक नव्हते, पण  भयंकर थंडी होती. अंगावर  अर्धे स्वेटर घालून आमचे मुंबईकर पाहुणे गाडीतून उतरले, त्यांना भयंकर थंडी वाजत होती, थंडीमुळे त्यांचा शरीराला कंप फुटला होता. मुंबैकरांबाबत काहीशी कल्पना होती, स्वेटरवर जेकेट घालूनच घरातून बाहेर पडलो होतो. आपले जेकेट त्यांना दिले. मुबैकाराना थोड बंर वाटले. आटो घेऊन घराकडे निघालो. आटोत बसतात त्यांनी प्रश्न विचारला परवातर तर दिल्ली आणि मुंबईच्या किमान तापमानात फक्त एका डिग्रीचा फरक होता, मग आज एवढी थंडी कशी काय?  मुंबैकरांनी हा प्रश्न का विचारला हे मला समजले नाही. काहीतरी उत्तर द्यायचे म्हणून म्हणालो दिल्लीत पाऊस आणि हिमाचल प्रदेशात बर्फ पडली कि दुसऱ्या तिसर्या दिवशी दिल्लीत भयंकर थंडी राहतेच. पण माझ्या उत्तरांनी त्यांचे समाधान झाले नाही. घरी आल्यावर  सर्वप्रथम मार्केट मध्ये जाऊन त्यांच्या साठी एक स्वेटर आणले.  सोमवारी नेहमी प्रमाणे मी कामावर गेलो, ते ही आपल्या कामावर गेले. मुंबैकरांचे  दिल्लीतले काम लवकरच पूर्ण झाले. चार-पाच वाजे पर्यंत ते घरी परतले होते. नेहमीप्रमाणे संध्याकाळी सात वाजता घरी पोहचलो. पाहतो, समोर सोफ्यावर मुंबैकर पाहुणे बसलेले होते,  वर्तमानपत्रांचा ढीग त्यांच्या समोर पडलेला होता. एका वर्तमान पत्रावर ते काही आंकडेमोड करत होते.  हात-तोंड  धुतल्यावर सौ. चहा नाश्ता (रोज संध्याकाळी घरी आल्यावर चहा सोबत काही न काही खायला सौ आणतेच) घेऊन आली.  सोफ्यावर बसताच,   मुंबैकर  गंभीर चेहरा करीत म्हणाले, विवेक (वयाने माझ्यापेक्षा मोठे होते) काल थंडीमुळे मला जो त्रास झाला त्या बाबत विचार करीत  होतो. गेल्या आठवड्याची वर्तमान पत्रे चाळली,  दिवसांचे कमाल आणि किमान तापमानांची नोंद घेतली.  आंकडे तपासले  निष्कर्ष काढला.  काल थंडीमुळे मला जो  त्रास  झाला, तो पुन्हा आता होणार नाही. माझ्या सारख्या अज्ञानी माणसाला त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय कळणार. प्रश्न वाचक मुद्रेने त्यांच्याकडे पहिले. मुंबैकर म्हणाले दिल्लीला निघण्यापूर्वी शनिवारी सकाळी ७ वाजता दूरदर्शन वाहिनी वर तापमान बघितले, शुक्रवारी मुंबईचे किमान तापमान १५ डिग्री होते तर दिल्लीचे १४ डिग्री. विचार केला दोन दिवसांसाठी दिल्लीत जात आहो, उगाच गरम कपडे का घ्यायचे. तापमानात थोडासाच तर फरक आहे. एक अर्धे स्वेटर अंगावर चढविले आणि निघालो. पण आता कळले, मुंबईचे कमाल तापमान ३० डिग्री होते आणि दिल्लीचे १६ त्याकडे लक्ष दिले नाही म्हणून घोळ झाला. सरासरी तापमानात एक डिग्रीचा नव्हे तर चक्क १०-१२ डिग्रीचा फरक होता.  माझ्या सारखे अनेक लोक कुठे निघताना, हिवाळ्यात किमान आणि उन्हाळ्यात कमाल तापमानाकडे बघतात, सरासरी तापमान किती आहे, याची दखल घेत नाही, त्या मुळे त्यांना त्रास होतो.  मी म्हणालो, च्यायला, उन्हाळ्यात दिल्ली आणि नागपूरचे अधिकतम तापमान एकच असले तरी ही नागपूरचा उन्हाळा का सहन होत नाही, तुमच्या या,  काय म्हणावे याला -थंडीच्या मीटर मुळे मला हे कळले. आश्चर्याचा धक्का लागल्या सारखे ते म्हणाले, थंडीचे मीटर, युरेका युरेका, मी थंडीच्या मीटरचा शोध लावला.  एखाद्या शास्त्रज्ञासारखा त्यांचा चेहरा उजळून निघालेला होता. अश्यारितीने आमच्या बुद्धिमान मुंबैकराने  थंडीच्या मीटरचा शोध लावला.

Saturday, December 13, 2014

चुन्नी मियां आणि बकरा


तीस -बत्तीस वर्षांपूर्वीची गोष्ट. आम्ही जुन्या दिल्लीत नई बस्ती या भागात राहत होतो.  शाळेला दसर्याच्या सुट्या सुरु होताच  आम्ही भावंडे चुन्नी मियां केंव्हा आमच्या घरी येणार याची वाट पाहायचो.  इंच टेप आणि मापे लिहिण्यासाठी एक जुनी फाटलेली वही घेऊन चुन्नी मियां घरी आले कि आमच्या आनंदाला उधाण येत असे. कारण वर्षातून एकदाच दिवाळी साठी  नवीन कपडे मिळणार.  शिवण्यासाठी कापड ते स्वत:च आणायचे. चुन्नी मियां यांनी शिवलेले कपडे घालणारे  पोरें दुरूनच ओळखता येत होती. सर्वांचे कपडे एक सारखेच.  

नई बस्तीतून, तिलक बाजार कडे जाणार्या गल्लीत चुन्नी मियां यांचे दुकान आणि राहते घर होते. दुकान छोटेसे होते, एक बसण्यासाठी खुर्ची, समोर जुनाट टेबल आणि तेवढीच जुनी उषा सिलाई मशीन. त्याच गल्लीत अमजद कसाई याचे दुकान ही होते. (शोले पिक्चर लागल्या नंतर आम्ही मुलें त्याला गब्बर सिंग म्हणू लागली आणि त्याचा दुकानासमोरून जाताना मुद्दामून जोर जोरात शोलेतला संवाद म्हणायचे , पचास कोस दूर दूर के बकरे अमजद कसाई का नाम सुनकर...). असो.  

अमजद कसाई आणि चुन्नी मियां यांच्यात बोलचाल बंद होती. कारण ही तसेच होते. चुन्नी मियां यांनी कपडे बरबाद केले म्हणून शिलाईचे पैसे अमजद यांनी दिले नाही.  चुन्नी मियां शिलाईचे पैसे मागायला गेले कि काही न काही बहाणा करून, अमजद भाई पैसे देण्याचे टाळायचे.  अमजद भाई सारख्या दबंग माणसाकडून पैसा वसूल करणे चुन्नी मियां यांना शक्य नव्हते. माझा मुसलमान मित्र कालू (त्याचे खरे नाव काय होते, कधीच कळले नाही), आणि मी  चुन्नी मियांच्या दुकाना समोरून जाताना नेहमीच मियाजींची फिरकी घेत असू.  मियांजी, अमजदने आपके पैसे दिये कि नहीं.  मियांजी ओरडतच म्हणायचे,  नाम मतलो उस पाजी हरामखोर का?  वह क्या समझता है, चुन्नी  मियां के पैसे डुबायेगा,  मेहनत की कमाई है.  पैसे नहीं चुकाए तो देखना एक दिन उसकी मोटी गर्दन पकड़कर कोई बकरा ही उसे हलाल करेगा. सुबह-सुबह आ जाते हो खामकका परेशान करने. भागो शैतानो यहां से. आम्ही हसत-हसत तेथून धूम ठोकायचो. 

एक दिवस बघितले, मियांजीच्या दुकानासमोर, एक बकरा बांधलेला होता. सहज विचारले. कुर्बानी के लिए  बकरा ख़रीदा है, म्हणत मियांजी बकऱ्याला आपल्या हातानी बदाम खिलवू लागले. कालूला राहवले नाही, वाह! मियांजी,  यहाँ दो टैम रोटी के लाले पड़े हैं और बकरा बादाम पाड़ रहा है.  चुन्नी मियां त्याचाकडे पाहत म्हणाले, यहाँ आके बंध जा, तुझे भी बादाम खिलाऊंगा आणि हाताने गळ्यावर छुरी फिरवण्याचा अभिनय केला.  कालू ही कमी नव्हता, जोरात ओरडला, एक बादाम की  खातिर बच्चे की जान लोगो, जहन्नुम में जाओगे मियांजी. चुन्नी मियां यांनी मारण्यासाठी काठी उचलली आणि नेहमीप्रमाणे आम्ही तेथून पळ काढला. 

बकरीदच्या दोन-तीन दिवसांनी पुन्हा आम्ही मियांजीच्या दुकानासमोरून गेलो. बघितले, बकरा तिथेच बांधलेला होता. चुन्नी मियां ही उदास दिसत होते. मी विचारले,  मियांजी क्या बात है, बकरे कि कुर्बानी नहीं दी क्या? मियांजी म्हणाले, बेटे दिल लग गया. मियांजी पुढे काही म्हणणार, कालू एक डोळा मिचकावित म्हणाला,  क्या जमाना आ गया है. इन्सान बकरों से मोहब्बत करने लगें है.  चाचीजान  को बताना हि पड़ेगा. मियांजी जवळ ठेवलेला डंडा उचलत म्हणाले,  बत्तमीज, शैतान, भाग यहाँ से.  तेथून पळ काढण्यातच भलाई होती.

पुढे जवळपास एका आठवड्या नंतर, पुन्हा मियांजीच्या दुकानासमोरून गेलो या वेळी तिथे बकरा बांधलेला नव्हता. बकर्याचे काय झाले या उत्सुकता पोटी मियांजीना विचारले, मियांजी बकरा कहाँ गया?  मियांजी म्हणाले, अमजद कसाई को बेच दिया, कई दिनों से नजर थी उसकी बकरे पर.  मी विचारले, मियांजी पैसे दिए की नहीं दिए, या मुफ्त में उड़ा के ले गया. मियांजी म्हणाले,  पूरे नगद २०० रूपये में बेचा है. ये बात अलग है इतने के तो बादाम ही खिला दिए थे, उस हरामखोर, पाजी बकरे को.  फिर भी सौदा घाटे का नहीं रहा. कालूला राहवले नहीं, मियांजी आप तो उससे मोहब्बत करते थे, कसाई को बेच दिया, अब तक तो कट भी चुका होगा. चंद चांदी के टुकड़ों की खातिर मोहब्बत कुर्बान कर दी, लानत है आप पर.  या वेळी मात्र  मियांजी चिडले नहीं, म्हणाले उस कमीने से कौन महब्बत करेगा. बकरीद के पहले की रात, उसे बादाम खिला रहा था. उस कमीने बकरेने  ने इंसानी आवाज में मेरे कान में  कहा, मियांजी, ख़बरदार मुझे कुर्बान किया तो, अगले जन्म में कसाई बनकर तेरी गर्दन पर छुरी चलाऊंगा. डर गया मैं. अब सवाल था, बकरे का क्या करें. अचानक अमजद कसाई का ख्याल आया. बेच दिया उसको. त्या वर कालू म्हणाला, तो अगले जन्म में अमजद कसाई कि गर्दन पर छुरी चलेगी. एक तीर से दो शिकार कर दिये मियांजी आपने. चुन्नी मियां खळखळून हसले.



Wednesday, December 10, 2014

धुकं


धुक्यात उमटली 
चित्रे काही 
त्यास समजलो 
जीवन नाती 


धुक्यातली नाती
धुक्यात विरली
जीवन यात्री 
उदास एकाकी



Sunday, December 7, 2014

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।


कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। 

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि॥ २-४७

भगवंत म्हणतात:
१. माणसाला कर्म करण्याचा अधिकार आहे 
२. कर्मफळ माणसाच्या हातात नाही. 
३. कर्मफळाची आशा न ठेवता अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे.


भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातल्या ह्या श्लोकाला वाचताना मनात गोंधळ हा निर्माण होतोच. बहुतांना असे वाटते हा श्लोक माणसाला कर्मापासून परावृत्त करून भाग्यवादी बनवितो.  पण हे खरे नाही. आपल्याला नेहमीच असे वाटते, आपण जर कर्म केले तर त्याचे फळ मिळायलाच पाहिजे. हेच योग्य आणि न्यायपूर्ण. जर कर्माचे फळ मिळणार नसेल तर कर्म कशाला करायचे, असा प्रश्न मनात येणारच. मग भगवंतांनी गीतेत कर्म फळावर, कर्म करणार्याचा अधिकार नाही, हे का म्हंटले आहे? हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण पाहतोच मुलाने उत्तम अभ्यास केला तर त्याला परीक्षेत उत्तम गुण मिळतात. उत्तम अभ्यास = उत्तम गुण सहज सोपी नियम आहे. पण नेहमीच असे होत नाही.  कुणी विद्यार्थी आजारी पडतो आणि पेपर देऊ शकत नाही. कुणाला अपघात होतो, परीक्षा केंद्रावर पोहचू शकला  नाही.  कुणाला पेपर तपासताना क्वचित होणाऱ्या चुकी मुळे ९० च्या जागी ०९ मार्क मिळतात.  तो चक्क नापास होतो.  SSCचा टायपिंगचा पेपरात नेहमीचेच आहे, प्रत्येक केंद्रात २-३ परीक्षार्थी  केवळ  टाईपरायटर  खराब झाल्या मुळे  अयशस्वी होतात. त्यांना सरकारी नौकरी मिळत नाही. त्यांची तैयारी व्यर्थ जाते.  शेतकरी ही उत्तम बियाण्यांची पेरणी करतो, शेतात जातीने लक्ष देतो,  खत,  पाणी व  मशागत सर्व उत्तम प्रकारे करतो, पिक ही भरपूर येते, पण कित्येकदा गारपीट, अवेळी पावसामुळे त्याचे अतोनात नुकसान होते. त्याला ही पाहिजे तसे फळ मिळत नाही.    


वरील उदाहरणांनी एक बाब स्पष्ट होते, सर्वांनी उत्तम कर्म केले पण तरी ही त्यांना फळ मिळाले नाही.  कर्म करणे माणसाच्या हातात आहे, पण आपल्या कर्मावर प्रभाव टाकणाऱ्या इतर बाबींवर आपले नियंत्रण नसतेदेश, काळ, राजनीतिक परिस्थिती एवं इतरांच्या कर्मांचा प्रभाव ही आपल्या कर्मांवर पडतो.  समर्थांनी या आपल्या कर्मांवर प्रभाव  टाकणार्या इतर  बाबींचे वर्णन, "अध्यात्मिक ताप"  (देह,  इंद्रिय आणि प्राण यांच्या संयोगाने होणारे ताप - शारीरिक व मानसिक व्याधी इत्यादी ) आणि "आधिभौतिक ताप" (सर्व पंचभूतांच्या संयोगाने जे त्रास होतात अर्थात सर्व प्रकारचे बाह्य कारणे  - अपघात, सर्पदंश, चोरी, डकैती, आग, अतिवृष्टी, पूर, परचक्र, राजा एवं अन्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून छळ इत्यादी)   [दशक , समास ६ आणि ७] असे केले आहे. या सर्व बाबींवर कर्म करणार्याचे नियंत्रण नसते, म्हणूनच भगवंतानी म्हंटले आहे, कर्मफळावर कर्म करणाऱ्याचा अधिकार नाही, केवळ कर्मावर त्याचा अधिकार आहे

कर्मांचे फळ मिळाले नाही तर माणूस निराश होतो. आज ह्या मुळेच अनेक शेतकरी आत्महत्या करतात, पेपर मध्ये नापास झाल्याने विद्यार्थी ही आत्महत्या करतात. किंवा लोक कर्म करणे सोडून देतात.  मृत्युलोकाला 'कर्मलोक' ही म्हणतात, इथे कुणाला ही कर्म चुकलेले नाही. कर्म हे करावेच लागणार,  त्या शिवाय या लोकात कुणी जगू शकत नाही.   म्हणूनच भगवंतानी गीतेत म्हंटले आहे, अनासक्त भावनेने माणसाने नियत कर्म करत राहिले पाहिजे.  असे  कर्म  केल्याने आपल्या कर्माचे आपल्याला पाहिजे तसे फळ मिळाले नाही तरी ही आपल्याला त्याचा जास्त त्रास होणार नाही.


कर्माची अपेक्षा न ठेवता उत्तम  रीतीने कर्म करणे, हे जर शेतकरी राजाला कळले, तर तो कुठल्या ही परिस्थितीत निराश होणार नाही.  आत्महत्या न करता पुन्हा पुढच्या पिकाच्या तैयारीला लागेल. विद्यार्थी ही पुन्हा जोमाने अभ्यास करून, परीक्षेत उत्तम गुण मिळविण्याचा प्रयत्न करेल. हेच भगवंताना गीतेत सांगायचे असेल.










Saturday, December 6, 2014

झुंज - अंधाराच्या राक्षसांशी



डिसेंबर महिना सुरु झालेला आहे, सूर्यास्त लवकर होऊ लागला आहे, चार्टर बस मधून घरी परतताना, अस्तांचल जाताना सूर्य  दमलेला, ओजहीन दिसत होता.  सूर्य अस्त होताच,  थंड गार वारे अंगाला झोंबू लागले. बसची खिडकी बंद केली. काळजात धस्स झाले. चित्र-विचित्र  निराशेने भरलेले विचार मनात येऊ लागले. खरं म्हणाल तर मला हिवाळ्याची भीतीच वाटते. जिथे साक्षात सूर्यदेव शक्तीहीन झाले तिथे सामान्य माणसांचे काय.  हिवाळा म्हणजे छोटे दिवस आणि मोठ्या रात्री. सूर्याची भीती नाहीशी झाल्याने मानवाला त्रास देणाऱ्या अंधाराच्या राक्षसांचे बळ वाढते. दुसऱ्या शब्दांत हिवाळा म्हणजे अंधाराच्या राक्षसांचे राज्य. काही दया-माया न बागळता हे राक्षस आपल्या शरीरातील सर्व  उर्जा, तेज, शक्ती  शोषून घेतात.  किती ही गरम कपडे घातले तरी ही बचाव होत नाही. रात्री बिछान्यावर पडल्यावर वाटू लागले  शरीरातील जुन्या जखमा अंग वर काढू लागल्या आहे, नवीन जखमा ही भरभरून वाहू लागल्या आहे. असह्य वेदनांमुळे  डोळा लागत नाही. हे अंधाराचे राक्षस व्याधीग्रस्त मानवांवर हिंस्त्र प्राण्याप्रमाणे तुटून पडतात. व्याधीग्रस्त  माणसांना तडपवून  मारण्यात राक्षसाना आसुरी आनंद मिळतो. किती ही डोक्यावर पांघरूण घेऊन त्यात दडले तरीही राक्षसांच्या भेसूर हास्य आणि डरकाळ्या सतत रात्रभर ऐकू येतात.  बिछान्यावर कड बदलता- बदलता सारी रात्र निघून जाते. तेंव्हा कुठे जाऊन ब्राह्म मुहूर्तावर  डोळा लागतो.  सकाळी घड्याळाच्या गजरा बरोबर जाग येतेच (सवयच आहे ती). आधी शरीरला चिमटा घेऊन जिवंत असल्याची खात्री करतो, भिंतीवर लटकलेल्या घड्याळा कडे पाहतो, सकाळचे साडेपाच वाजलेले असतात. उठण्याची इच्छा नसते तरी ही देवाचे नाव घेऊन कसा-बसा उठतो. आता पुढचे दीड महिना तरी असेच हाल होणार. जनवरी महिन्यात संक्राती येईलच. सूर्याचे तेज पुन्हा वाढू लागेल. सूर्याच्या उर्जेने शरीरात नवचैतन्य येईल. तो पर्यंत तरी रोज जगण्यासाठी संघर्ष करावाच लागणार. ...शरीरात साठविलेल्या शक्तीने अंधाराच्या राक्षसांशी झुंज देत देत....आयुष्याची गाडी पुढे रेटावी लागणार.