Tuesday, December 31, 2013

चोरी झाल्याचा आनंद

घरी चोरी झाली तर आपल्याला दु:ख होते. चोरी का झाली? चोरी टाळता आली असती का? आपल्या लापरवाहीचे खापर घरातल्या कुणाच्या तरी डोक्यावर आपण फोडतोच. घरच्या सर्वाना चोरीपेक्षा चोरीमुळे पोलीस, शेजारी, मित्र-मंडळी इत्यादीचा ही त्रास होतोच. शेजार-पाजार्यांना फालतू चर्चे साठी एक विषय मिळतो.

पण कधी-कधी असे ही होते, घरी चोरी झाल्याचा त्रास होण्याऐवजी, त्याचा आनंद होतो. असाच, चोरीचा एक किस्सा आहे. गुप्ताजी आणि शर्माजी दोघांचे घर लागून होते. तो महिन्याचा शेवटचा दिवस होता, नेहमीप्रमाणे सकाळी गुप्ताजी आपल्या दुकानात आणि शर्माजी आपल्या ऑफिसात.  त्यांची मुले शाळेत गेलेली होती.  वर्माजींच्या घरी पूजा-पाठ होता, दोन्ही घरच्या स्त्रियातिथे गेल्या होत्या. दिल्लीत कुठे ही पूजा-पाठ असेल लाउडस्पीकर हा जोरात वाजविला जातो. पूजेपेक्षा, घरात पूजा-पाठ आहे, हे सर्वांना कळणे महत्वाचे. (दिल्लीकरांची दिखाऊ प्रवृत्ती). भुरट्या चोरांना ही याचा फायदा मिळतो. अशीच संधी-साधून एक भुरटा चोर गुप्ताजींच्या घरी शिरला. हा चोर फक्त नगदी चोरायचा. त्यास गुप्ताजींच्या घरी वीस-पंचवीस हजार रुपये भेटले. तिथून तो गच्ची वर गेला. शर्माजींचा गच्चीवरचा दरवाजा उघडा होता. चोर उडी मारून शर्माजींचा घरात शिरला. आता आपले शर्माजी सरकारी कारकून त्यात ही केंद्र सरकारच्या कार्यालयात काम करणारे (दुसर्या शब्दात मजबूरीने इमानदार असलेले). त्यांचा एक तृतीयांश पगार (१/३) पोरांच्या शिक्षणात खर्च होता. (दिल्लीत अधिकांश शाळा निजी मालीकीच्या आहे, पहिलीची फी ही दोन हजारापेक्षा कमी नसते. 
उरलेल्या पगारात कसे-बसे घरचा खर्च चालविणारे सरकारी बाबू. महिना अखेरी “ठणठण गोपाल” ही परिस्थिती त्यांच्या घरी नेहमीचीच. चोराला घरात काही चिल्लर नोटां शिवाय काहीच सापडले नाही. उगाच वेळ व्यर्थ गेला म्हणून त्यांने वैतागून एका कागदावर खरडले ‘ओय कंगले, इमरजेंसी वास्ते हजार- दो हजार तो घर में  रख्खा कर’ (भिकारडया, घरात कमीत-कमी इमरजेंसी साठी हजार-दोन हजार तर ठेवत जा) आणि एक हजाराची नोट त्या सोबत ठेउन तो निघून गेला अर्थातच गुप्ताजींच्या घरून चोरलेली. 


चोरानी एका रीतीने शर्माजींच्या थोबडातच मारली होती. साहजिकच आहे, ही चोरी गल्लीत चर्चेचा विषय झाली. शर्माजी सरकारी बाबू आहेत, ते इमानदार आहेत. कदाचित शर्माजींची बायको खर्चिक असावी. तसे शर्माजी सीधे-साधे  सरळमार्गी दिसतात पण कदाचित त्यांना कसलंतरी व्यसन असावं. त्यातच त्यांचा पगार खर्च होत असेल अन्यथा हजार-दोन हजार घरात असतातच. लोक शंकेच्या दृष्टीने त्यांच्याकडे बघू लागले. काही ही म्हणा,  लोक व्यवहारी असतात. असल्या कंगल्या माणसाकडून आपल्याला काहीच फायदा नाही. उलटपक्षी काही मागण्याची भीती. शर्माजींचा दुआ-सलाम ही कमी झाला. दुसऱ्या शब्दांत त्यांची इज्जत कमी झाली.

दुसरी कडे, गुप्ताजींची इज्जत वाढली. वेळी-अवेळी हा माणूस आपल्या कामी येऊ शकतो, आपल्याला मदत करू शकतो, असे शेजारी-पाजार्याना वाटणे साहजिकच होते. त्याची दुआ-सलाम ही वाढली, मोहल्यातील सर्व लोक गुप्ताजींशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागले. ते ही चोरीची घटना गर्वाने छाती फुलवून रंगवून-रंगवून सांगू लागले. “अरे, उस दिन घर में लाख-डेढ़ लाख पड़ा था, भला हो उस मूर्ख चोर का, जिसे पडौसी शर्मा के घर जाने की जल्दी थी. अरे, उसका पूरा का पुरा घर खोद डालता तब भी उस कंगले के यहाँ कुछ नहीं मिलता.  भगवान जो करता है, अच्छा ही करता है. हा! हा! हा!”

मला ही आत्ता असाच अनुभव आला. दोन-तीन दिवसांपूर्वी मला कळले माझ्या ब्लाग वर लेख छापण्या पूर्वीच दोन महाभागांनी तो लेख आपापल्या ब्लागांवर त्यांचा नावाने प्रकाशित केला. मला आश्चर्य वाटले. सौभाग्याने तो लेख आधी  मराठीसृष्टी या वेबसाईट मी टाकलेला होता. त्याची लिंक सापडली. पण मानसिक त्रास हा झालाच. काल ऑफिसात गेलो होतो. आमच्या कार्यालयात सर्वाना इंटरनेट उपलब्ध नाही आहे. भविष्यात त्रास होऊ नये म्हणून त्या वेबसाईट वर ‘माझे लेख’ या जागेवर जाऊन आपल्या सर्व लेखनाची डिटेल (पाच-सहा पाने) कापी करून घेण्याचे ठरविले.

माझ्या मित्र सुनीलच्या  सेक्शन मध्ये इंटरनेट सुविधा होती. लंच टाईमला त्याचा कडे गेलो. तसा सुनील ही ऐक वेगळाच औलिया आहे. मुक्ताफळे तर त्याच्या तोंडावर खेळत असतातच. सुनील, काही प्रिंट घ्यायचे आहे. तो  म्हणाला ‘भाई कविता हो तो चुपचाप लेके पिछली गली से खिसक जा. आज कान में रखने के लिए रुई नहीं है, सुनाएगा तो खूप मारूंगा’(कवितेचे प्रिंट घेउन चुपचाप खिसक, ऐकविण्याचा प्रयत्न केला तर खूप मारीन). मी त्याला घडलेला प्रकार सांगितला. त्या वर तो उद्गारला ‘तेरे जैसे टुच्चों को कोई छापने वाला मिलता नहीं है, बस वेबसाइट लिखकर अपनी खुरक मिटाकर खुद को लेखक समझ रहे हैं(तुझ्यासारखे फालतू लोक, वेबसाइट वर लिहून, आपली खाज मिटवितात आणि स्वत:ला लेखकु समजतात). अरे, पण आता तुला खुश व्हायला पाहिजे. मी म्हणालो, यात खुश होण्यासारखे काय आहे.  सुनील म्हणाला, अरे ज्या वस्तूला काही किंमत असते त्याची चोरी होऊ शकते. भले ही किंमत चार आणा-आठाना का असेना. सॅारी, या पेक्षा छोटा सिक्का आजकाल मिळत नाही, तशी कविता इत्यादींची  किंमत त्या पेक्षा निश्चित कमी असेल.

माझ्या डोक्यात प्रकाश पडला, गुप्ताजींची आठवण झाली. गर्वाने छाती फुलवून रंगवून-रंगवून चोरीची कहाणी ऐकवितात. आपली नसलेली छाती फुलते आहे, असा भास मला झाला.  सुनीलने  माझ्या चेहऱ्यावरचे भाव पटकन ओळखले. पक्का बाबू असल्यामुळे मुर्गा पटकन कसा कापला पाहिजे ह्या कलेत तो पारंगत होताच, लगेच म्हणाला, तो इस ख़ुशी के मौके पर एक-एक कप काफी हो जाय. अश्या रीतीने साउथ ब्लॉकच्या काफी हाउस मध्ये कॉफी पीत-पीत चोरी झाल्याचा आनंद आम्ही साजरा केला.   

Sunday, December 29, 2013

शतशब्द कथा - मोबाईल वाली ती



रस्त्याच्या काठावर मित्रांसोबत झाडाखाली एका बेंच वर बसलो होतो. येणारी-जाणारी *हरियाली निहारीत डोळ्यांना तृप्त करत होतो.  तेव्हड्यात तिच्याकडे लक्ष गेलं. कानात हेडफोन, हातवारे करीत कुणाशी गुलगुल बोलत होती. निरखून बघितले, प्रेमाचा रंग तिच्या गालावर खुलून दिसत होता. रस्त्याच्या पलीकडे बहुधा तिचा प्रियकर असावा. कदाचित त्याचाच स्वप्नात दंग, ट्रफिकची चिंता करता, बेपर्वा ती, तिच्याच धुंदीत रस्ता पार करू लागली.
 
'
अरररे...' अचानक मी किंचाळलों. डोळे बंद केले. क्षणभर शांतता! मग एकच गदारोळ. एक गुलाबाची कळी पायाखाली  चुरगळली होती. 

*
हरियाली निहारना: एका जागेबर बसून एका तरुण मुलींना बघण्याचा छंद (टिपिकल दिल्लीची भाषा).

Wednesday, December 25, 2013

हिवाळ्याची मौज: फुलगोभी मटार पोहे


मी रहात असेलेल्या उत्तम नगर भागात डिसेंबर महिना सुरु झाल्या बरोबर भाज्या स्वस्त होऊ लागतात. ४-५ किलोमीटर दूर एक मोठी सब्जीमंडी आहे व शिवाय दिल्लीचा ग्रामीण भाग ही जवळ आहे. शिवाय येथे दररोज जवळपास (किलोमीटर आतच कुठे न कुठे साप्ताहिक बाजार लागतोच). गेल्या सोमवारच्या बाजारात सर्वच भाज्या पालक, बाथू, सरसों, मुळा, गाजर इत्यादी १० किलो होत्या. फुलगोभी ही १० रुपये किलो आणि कोथिंबीर ५ रुपये पाव, त्यामुळे ३५ रुपये  किलो असलेले मटार घेणे परवडण्यासारखे. (मुंबई वाल्यांना जळण तर नाही होत आहे)  

दररोज संध्याकाळी घरी (७-७/३० मध्ये)पोहचल्या वर चहा बरोबर नाष्टा हा असतोच. उशीर झाला तर सरळ रात्रीचे जेवण (नऊच्या आत). आज २५ डिसेंबरची सुट्टी असली तरी कामानिमित्त कार्यालयात जावे लागले. संध्याकाळी ५ वाजता घरी पोहचलो. सौ. म्हणाली फुलगोभी घालून मटार पोहे चालतील का? हेच खाण्यासाठी हिवाळा केंव्हा सुरु होतो याची वाट बघत असतो.  (शिवाय बटाटे घालून कांदे पोहे खाण्यापेक्षा मटार पोहे केंव्हाही आवडणारच). मुलीचे लग्न झाल्या पासून घरात आम्हीतीन माणसेच. तसा मुलगाही भयंकर खादाडखाऊ आहे. तीन प्राण्यांसाठीच कृती देत आहे.

साहित्य: पोहे ४ वाटी, १ वाटी बारीक चिरलेली गोभी, ३/४ वाटी मटार, १/२ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची १.  शिवाय फोडणी साठी मोहरी व तेल. हळद (१/२ चमचे) तिखट/मीठ  (आवडीनुसार), चाट मसाला(एम डी एच) स्वाद वाढविण्यासाठी (१ चमचा), (साखर १ चमचा), लिंबू एक किंवा आमचूर पावडर (१ चमचा).

कृती: पोहे भिजवून घ्या (पोहे व्यवस्थित भिजलेले पाहिजे, पण जास्त पाणी ही नको व कमी ही नको पोहे भिजविणे पण एक कलाच आहे), कढई गॅसवर ठेवून तेल गरम झाल्यावर मोहरी फुटल्यावर हिरवी मिरची, मटार आणि फुलगोभी टाकून,  कढई वर झाकण ठेवून ३-४ मिनटे पर्यंत या  भाज्या शिजू ध्या.

२-३ मिनिटात पोहे पाणी पिऊन घेतात. हातानी पोहे पसरतात आहे, हे बघून हातानीच पोह्यात हातानेच तिखट, हळद, चाट मसाला, मीठ साखर सर्व बाजूनी टाकावी. चिरलेली कोथिंबीर ही अशीच टाकावी व नंतर लिंबू पिळावा. हलक्या हातानी पोह्यात वरील सर्व साहित्य व्यवस्थित मिसळावे. गोळे न पडण्याची खबरदारी घेणे गरजेचे. ३-४ मिनिटात मटार गोभी शिजली वाटतच  पोहे कढईत टाकून परतावे  व झाकण ठेऊन १-२ मिनटे वाफ काढावी.  

वरून थोडी कोथिंबीर घालून गरमा-गरम पोहे,  लिंबाच्या लोणच्या बरोबर अप्रतिम लागतात. 

Sunday, December 22, 2013

पौष्टिक पदार्थ (१) बीटच्या पुऱ्या आणि बटाट्याची भाजी.


लहान मुलांच्या आवडी-नावडी फार असतात. बहुतेक पदार्थ आणि भाज्या आई-वडिलांना आवडत नाही पण   पोरांच्या नावाने बोंब मारायला मोकळे होतात आमच्या मुलांना हे आवडत नाही किंवा ते आवडत नाही. . केवळ बटाटा, अरबी आणि भिंडी शिवाय दुसरी भाजी न आवडणारे, पुष्कळ  मुलें बघितली आहे. आमच्या सौ ला न आवडणाऱ्या भाज्या  मुलांच्या पोटात कसं पोहचवायचं ही कला चांगलीच अवगत आहे. तिने खाऊ घातलेले मुलांना आणि मला, पदार्थ आपल्या पर्यंत पोहचवीत आहे. माजी मुले सर्व भाज्या आनंदाने खातात त्याचे श्रेय सौ लाच.    बीट आयरन युक्त अत्यंत पौष्टिक कंद आहे. पुरी आणि बटाट्याची भाजी मुलांना आवडतेच. 


साहित्य : कणिक तीन वाटी, बेसन :१ वाटी (आवश्यक नाही, आवडत असेल तरच) , बीट: १ (१०० ग्राम) जीरा आणि ओव्याची पावडर (प्रत्येकी अर्धा चमचा) व   मीठ  स्वादानुसार व तेल तळण्यासाठी.  

कृती: बीटला सोलून, कापून, थोड पाणी घालून ४-५ मिनटे गॅसवर ठेवा. नंतर मिक्सित घालून पेस्ट बनवून घ्या. कणिक, बेसन एकत्र करून त्यात बीटची पेस्ट, जीरा, ओवा पावडर, मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून पुरीचे पीठ मळून घ्या.  कढई गॅसवर ठेवून त्यात तेल घालून, पुऱ्या तळून घ्या. 


बटाट्याची भाजी: बटाट्याची भाजी सर्वच बनवितात पण तरी ही कृती खाली देत आहे. 

साहित्य: उकळलेले बटाटे (१/२ किलो) , हिरव्या मिरच्या २-३, अदरक -लहान तुकडा (मिरची आणि अदरक ची पेस्ट करून घ्या), टोमाटो २-३ (१०० ग्राम) बारीक चिरलेले , हळद, मोहरी, हिंग,जिरे (१/२ चमचे) गरम मसाला (१/२ चमचा), धनिया पावडर (१ चमचा) व तेल (३-४ चमचे –जास्त ही चालेल) व कोथिंबीर (भरपूर) . (कांदे लहसून खाणारे, कांदे लहसून ही घालू शकतात  शकतात). 

कृती: कढई गॅसवर ठेवा त्यात तेल ओता. तेल गरम झाल्या वर मोहरी घाला. मोहरी तडकल्यावर त्यात हिंग, जिरे घाला मग बारीक चिरलेले टोमाटो त्यात घाला. ३-४ मिनटे झाल्या वर तेल सुटू लागेल मग त्यात अदरक मिरची ची पेस्ट घाला, थोड थांबून हळदी, धनिया पावडर, गरम मसाला घाला. नंतर १ गिलास पाणी व स्वादानुसार मीठ घालून एक उकळी येऊ ध्या. मग उकळलेले बटाटे कुस्करून त्यात घाला (चिरलेल्या पेक्षा कुस्करून बटाटे घातल्यास स्वाद जास्ती चांगले येतोझ). पुन्हा १-२ मिनटे उकळी आल्या वर कोथिंबीर घालून गॅस बंद करा. 

बीटची पुरी आणि बटाट्याची भाजी लहान मूले  आनंदाने खातील. 

ह्याच प्रमाणे पालकाची पुरी सुद्धा बनविता येते. पालकाला बारीक चिरून, ३-४ मिनटे गॅस वर ठेऊन. नंतर मिक्सित घालून पेस्ट तैयार करून, बीटच्या पुरी प्रमाणे पालकाची पुरी तैयार करता येईल. 


Sunday, December 15, 2013

बसा की एकदा खुर्ची वरती


कसला राव विचार करता
बसा की एकदा खुर्ची वरती
तोडा आकाशीचे तारे
पूर्वा हौस जनतेची.

विजेची बिल कमी करा
मुफ्त मध्ये पाणी द्या
दाखविलेले स्वप्न जनतेला
तोडू नका हो राव तुम्ही.

पुकारते ही खुर्ची कसी
होऊ नका हो वनवासी
औलीयाची श्रापित वाणी
करू नका हो पुन्हा खरी.

औलिया: निजामुद्दीन औलिया "दिल्ली दूर आहे- असा त्यांनी बादशाहला श्राप दिला होता". तो खरा ठरला. तेंव्हा पासून ही म्हण प्रचलित आहे.

Monday, November 25, 2013

प्रश्नेलिका



(१)

ऊस शेतातला आता
कडू सगरा झाला
पण सागर सम्राटांना
मधुमेह कसा झाला?

(२)

(दिल्लीत दहावीचा निकाल ९८% पेक्षा जास्त लागला)

दहावीच्या परीक्षेत
सगरे झाले पास.
पण देवी सरसुती
कशाला हो रुसली?

Wednesday, October 16, 2013

एक आठवण / ती


कालचीच गोष्ट, कृषी भवन वरून ती मेट्रोत चढली. क्षणभराकरता नजरा भिडल्या. तब्बल तीस वर्षानंतर ती दिसली होती. रूप रंग बदलले असले तरी ही तिने मला ओळखले. एक मंद स्मित तिच्या चेहऱ्या वर उमटले. पण दुसऱ्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले, असे वाटले, वसंत ते शिशिराचा प्रवास क्षणातच घडला. तिने पाठ फिरवली आणि पुढच्याच अर्थात पटेल चौक स्टेशन वर ती उतरली. मी पाहताच राहलो. त्या वेळी सुद्धा ती अशीच आयुष्यातून निघून गेली होती, काही न बोलता.

पहिल्यांदा तिची भेट मंडी हाऊसच्या सरकारी वाचनालयात झाली. मला आठवते,  वसंत कानिटकरांचे ‘प्रेम तुझा रंग कसा’ ह्या नाटकाचे पुस्तक चाळत होतो. हे पुस्तक मला मिळेल का, हळूच तिने विचारले. ‘लेडीज फस्ट’, या सिद्धांताचे अनुकरण करून, पुस्तक तिला दिले. थेंकस, तिचा मंजुळ आवाज कानात घुमला. तिला वसंत कानिटकरांची नाटके आवडायची. नुकतीच ती सरकारी नौकरीच्या निमित्याने नागपूर हून दिल्लीला आली होती. तिलाही वाचनाची हौस. आमच्या गाठी-भेटी सुरु झाल्या आणि आयुष्यात ही प्रेमाचा वसंत फुलू लागला.

कित्येकदा लंच टाईम मध्ये चाणक्य थियेटर मध्य  पहिल्या रांगेत बसून आंग्ल भाषेतील न कळणारे अनेक सिनेमे बघितले, बहुतेक वेळा चित्रपटाचे नाव ही माहीत नसायचे, शिवाय अश्या वेळी सिनेमा पाहण्यात कुणाला रस? (सिनेमा किती ही हाउस फूल असला तरी चाणक्य थियेटरमध्ये, सिनेमा सुरु होण्याच्या अर्धातास आधी, पहिल्या दोन रांगांचे ६५ पैशाचे तिकीट मिळायचे, बहुतेक लंच मध्ये सिनेमा पाहणाऱ्या प्रेम करणाऱ्या सरकारी कर्मचार्यांसाठी केलेली सोय असावी). तिकीट नाही मिळाले तर समोरच्या ‘नेहरू पार्क’ मध्ये हातात हात घेऊन मनसोक्त हिंडायचो आणि तीन वाजे पर्यंत ऑफिस मध्ये परत. कुणालाही काही कळायचे नाही.

तो दिवस, मला चांगलाच आठवतो, ऑफिस सुटल्या वर सायंकाळी ती ‘आयएनए’ मार्केट वर भेटली होती. त्या वेळी तिथे आजच्या सारखी तिथे गर्दी नसायची. जवळ-पासच्या सरकारी कालोनीतले कर्मचार्यांचे परिवार तिथे खरीदारी करता यायचे. दक्षिण भारतीयांची संख्या ही त्यात मोठी. सहाजिक आहे, तिथे दक्षिण भारतीयांची इडली- दोस्याची तीन-चार दुकाने होती. साडे तीन रुपयात, साधारण डोस्यापेक्षा दुप्पट मोठा डोसा तिथे मिळायचा.  दोन लोक मिळून एक डोसाच खाणार हे दुकानदारांना नक्कीच माहीत असेल. कित्येक सरकारी बाबूंचे प्रेम प्रसंग इथल्या डोस्यांवरच फुलले आणि कोमजले असतील. अर्थात आम्ही ही एकच डोसा मागवत असू व त्या नंतर एकच कप  मद्रासी काफी मिळून पीत असू. (एका-दुसर्याला घास भरवत खाण्याचीही गम्मत फक्त प्रेम करणार्यांनाच कळू शकते). डोसा खाल्यावर दोघं दुकानातून बाहेर पडलो. मोगर्याचा सुगंध वातावरणात पसरलेला होता. सहज बघितल, एक पोरगा मोगऱ्याचे गजरे विकत होता. राहवले नाही, एक जोडी गजरा विकत घेतला.

ती म्हणाली हे काय?

मी: ‘तुझ्या काळ्याभोर केसांवर हा गजरा शोभून दिसेल’. 

ती: ही दिल्ली, आहे आणि  मला माहीत आहे, इथे कुंवाऱ्या पोरी गजरा नाही घालत.

मी: महाराष्ट्रात लहान पोरी सुद्धा गजरा घालतात, आपण मराठी आहोत.  

ती: आपण दिल्लीत राहतो, घरी आईने विचारले तर काय उत्तर देणार?  

मी: खरे काय ते एकदाचे सांगून टाक.

ती: लग्नाचे! तू करशील?

मी: नौकरी करणाऱ्या मुलीसोबत लग्न करायला मला निश्चित आवडेल.

ती: तुझी गाडी नेहमी पेश्यांवर येऊन  का बरं अडकते.  तू एकदम अरसिक आहे, तुला खूप खर्च करणारी आणि एक पै न कमविणारी मुलगी भेटली पाहिजे.

मी: ती, तू असेल तर मला आवडेल. ती चक्क लाजली. गजरा केसांत लावत ती म्हणालीमी कशी दिसते. मी: मोगऱ्याच्या फुलांपेक्षा ही सुंदर. 

त्या दिवशी मी आनंदात तरंगत-तरंगत घरी पोहचलो. दुसऱ्या दिवशी, ऑफिस सुटायचा आधी तिला फोन केला. दुसरी कडून, एक रुक्ष आवाज ऐकू आला, ‘उसकी ट्रान्सफर हो गयी है. कहाँ? हमें नहीं मालूम. कोई नंबर? नहीं मालूम. फोन ठेवला. पुढे कित्येक दिवस तिच्या फोनची वाट पाहत होतो.  न फोन आला, न ती भेटली. 

आज इतक्या वर्षानंतर ती भेटली आणि पुन्हा काही न वोलता निघून गेली. तिला आवाज द्यावीशी वाटत होती. दोन क्षण थांबली असती, बोलली असती तर काय झाले असते? गेलेला काळ आता परत येणार नव्हता.  जास्तीस-जास्त  सीपी मध्ये ‘कफे काफी डे’ मध्ये बसून एक कप काफी सोबत आयुष्याचा प्रवासाबद्धल बोललो असतो.  तिच्या नवऱ्या- मुलांची विचारपूस केली असती आणि  स्वत:च्या संसाराबाबत बोललो असतो. ती तिच्या संसारात सुखी असलेली पाहून, मला आनंदच झाला असता. ‘अगला स्टेशन उत्तम नगर ईस्ट है’ अनाउन्समेंट झाली. विचारांची तंद्रा भंग झाली.  स्टेशन वर उतरलो. घरच्या दिशेने चालू लागलो. नेहमीच्या फूलविक्रेत्या कडून एक जोडी गजरा विकत घेतला. दुकानदाराने सहज विचारले, आज भाभीजी का जन्मदिन है क्या? मी नुसताच हसलो.

घरी आलो. सौच्या हातात  गजरा ठेवला. हात-तोंड  धुतले. नेहमीप्रमाणे सोफ्यावर बसलो. सौ. चहा घेऊन आली. तिने केसांत गजरा घातलेला होता. चहाचा कप हातात देत, तिने आपले  मोठे आणि भेदक डोळे माझ्यावर  रोखत विचारले,  खरोखरच! हा गजरा तुम्ही माझ्या साठी आणला आहे. सौ. समोर खोट, बोलणे मला कधीच जमले नाही. मी म्हणालो, आज ती भेटली होती, पूर्ण कथा सांगितली. शेवटी म्हणालो गजरा घातलेली तू ही तिच्याच सारखी सुंदर दिसते आहे. सौ. ने हसत-हसत, खट्याळपणे विचारले. ती खरोखरची होती की कल्पनेतली?

मी नुसताच हसलो.