Saturday, July 9, 2016

अंधविश्वास भाग (२) - नकारात्मक लढा


http://vivekpatait.blogspot.in/2016/07/blog-post_7.html

अंधविश्वास - सार्थक लढा (भाग १) -अंधविश्वास म्हणजे काय?


नकारात्मक लढा 

एकदा नागपूरला एका लग्नात गेलो असताना, एक पुणेरी ग्रहस्थ मला भेटले होते. सहज अंधविश्वासावर चर्चा सुरु झाली. त्यांनी आपला एक अनुभव सांगितला. पुण्यात एका संस्थेने, अंधविश्वास विरोधात कार्य करणार्या एका संस्थेच्या महानुभावला बोलविले होते. सुरवातीला त्या महानुभावांनी आपल्या संस्थेचा परिचय दिला. भोंदू बाबांच्या विरोधात चाललेल्या त्यांच्या संस्थेच्या कामांची तपशील दिली. त्यांच्या संस्थेच्या कार्यात येणार्या अनेक संकटांचे विवरण हि दिले. समाजात पसरलेल्या अंधविश्वासांवर बोलताना मात्र ते रस्ता भटकले. थोडक्यात म्हणावे तर त्यांनी सत्यनारायण कथेचा माखौल तर उडविलाच पण अनेक पौराणिक कथांची खिल्ली हि उडविली. तिथे बसलेल्या लोकांमध्ये कुजबुज सुरु झाली. ह्या सदग्रहस्थांचा उद्देश्य अंधविश्वासांबाबत लोकांना जागरूक करणे आहे कि सनातन  धर्माच्या विरुद्ध प्रचार करणे. सारांश एवढेच, त्यांची मेहनत फुकट गेली. काय चुकल त्या विद्वान माणसाचे. लोक अंधविश्वासी का बनतात हे  त्यांना माहित नव्हते. जर मूळ समस्याच माहित नसेल तर तिचे समाधान कसे  सांगणार.  


समस्येचे मूळ कारण माहित नसल्यामुळे पौराणिक कथा आणि सत्यनारायण कथेचा माखौल उडवून आपण लोकांना जागृत करत आहोत असे त्यांना वाटले. जुन्या काळातल्या पौराणिक कथा, मग त्या देवी देवतांच्या, राक्षस, अप्सरांच्या असो  किंवा चान्दोबातल्या, या कथांमध्ये चमत्कार असतात.  या चमत्कारांचा उद्देश्य लोकांना सत्य आणि धर्माच्या रस्त्यावर चालण्याची प्रेरणा देणे असतो. ह्या कथा वाचून कोणी हि अंधविश्वासी बनत नाही किंवा भोंदू बाबांच्या जाळ्यात हि अटकत नाही. 

एक आणखीन मोठी  घोडचूक हि ह्या संस्था नेहमीच करतात. प्रत्येक समाजात जन्म ते मृत्य अनेक प्रकारचे संस्कार असतात. धार्मिक संस्कारांचा अंधविश्वास याशी काही एक संबंध नाही.  धार्मिक संस्कार आणि अंधविश्वास हे दोन्ही वेगळे विषय आहेत.  आपण समाजाचा हिस्सा आहोत, दर्शवण्यासाठी लोक समजासोबत आपले सुख आणि दुख वाटतात. इथे लोक खोट्या प्रतिष्ठेसाठी किंवा समाज काय म्हणेल यासाठी आपल्या चादरीपेक्षा (क्षमतेपेक्षा) जास्त खर्च करतात.  हि मूळ समस्या आहे. मुलाचे नाव ठेवणे असो किंवा श्राद्ध, आपण गाव जेवण हि घालू शकतो किंवा कमीत-कमी खर्चात घरातल्या घरात हि करू शकतो. काही नसेल तर पत्र-पुष्प देवाला वाहून हि आपण सर्व संस्कार करू शकतो.  शिवाय सर्व धार्मिक परंपरांचे पालन केलेच पाहिजे असे बंधन आपल्या सनातन धर्माने कुठेच घातलेले नाही. समाजाला  या दृष्टीकोनातून जागृत करण्याची गरज आहे. संस्कारांचा विरोध करण्यात काहीच अर्थ नाही.  आज आपण केक कापून वाढदिवस साजरा करतो. कारण समाजात काळानुसार संस्कार आणि परंपरा बदलत राहतातच. (इथे केक घरी कापायचा कि हॉटेलमध्ये जाऊन, हाही खर्चाचा विषय आहे, अंधविश्वासाचा नाही). 

धार्मिक अथवा पारंपारिक संस्कार यांना अंधविश्वासांशी जोडणे मुळातच चुकीचे आहे.  ह्या मुळेच लोक या संस्थांना धर्मविरोधी समजतात.  

या संस्थांचा दुसरा उद्देश्य भोंदू बाबांविरोधात कार्रवाई करणे.  यात संघर्ष हा आलाच. संघर्ष म्हंटला कि संघर्षरत दोन्ही बाजूंचे नुकसान होणारच. पण कधी-कधी निर्दोष लोकांचा बळी  हि यात जातोच.   जो पर्यंत  लोक उपाय सांगणार्या बाबांना  स्वखुशीने दक्षिणा  द्यायला तैयार आहे, तो पर्यंत भोंदू बाबांचे प्रस्थ कमी होणार नाही. एक आत गेला कि दुसरा त्याची जागा घेईलच.  समस्येचे समाधान लोकांना या बाबांकडे जाण्यापासून थांबविणे यात आहे. पण त्या साठी मूळ समस्या माहित असायला पाहिजे ना. 

सारांश, अधिकांश अंधविश्वास विरोधी संस्थांचे धोरण नकारात्मक आणि दुसर्यांच्या विरोधावर आधारित असल्यामुळे अपेक्षित परिणाम हि मिळत नाही परंतु  शत्रू मात्र भरपूर पैदा होतात. 


क्रमश: 


















No comments:

Post a Comment